काश्मीरवरून गौतम गंभीरचा हल्ला
नवी दिल्ली : 'काही लोक कधीच मोठे होत नाहीत. ते क्रिकेट खेळतात, पण त्यांचे वय वाढतच नाही. त्यांची बुद्धीही वाढत नाही. जर त्याला प्रत्येक गोष्टीचे राजकारण करायचे असेल तर तो राजकारणात का प्रवेश करीत नाही? पण राजकारणातही परिपक्व लोक लागतात. त्याचाही त्याच्याकडे अभाव आहे,' अशा शब्दांत माजी कसोटीपटू व खासदार गौतम गंभीर याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याच्यावर हल्ला केला. जम्मू-काश्मीरवरून या दोन्ही खेळाडूंमध्ये गुरुवारी ट्वीटरवर वाद रंगला. काश्मिरींसाठी आपण लवकरच सीमेवर भेट देणार असल्याचे आणि शुक्रवारी महंमद अली जिना यांच्या कबरीलाही भेट देणार असल्याचे आफ्रिदीने म्हटले होते. त्यावर, आफ्रिदी हा परिपक्व झालेला नसून त्याने मदतीसाठी ऑनलाइन बालवाडीचा कोर्स करावा,असा टोला गंभीरने मारला. आफ्रिदीनेही गंभीर हा मानसिकदृष्ट्या असुरक्षित, नकारात्मक आणि निराशावादी असल्याचे म्हटले.
काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोपही केला. त्यालाही गंभीरने सडेतोड उत्तर दिले. 'हे सगळे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये होत असून, काळजी करू नकोस, लवकरच तोही आम्ही सोडवू' असे प्रत्युत्तर गंभीरने दिले.