अ‍ॅपशहर

मुख्यमंत्री अखिलेश यांनी वडलांशी बोलणंच टाकलं!

उत्तर प्रदेश सरकारमधील वर्चस्वाच्या वादातून मुलायम सिंह यादव यांचे पुत्र मुख्यमंत्री अखिलेश यादव व बंधू शिवपाल यादव यांच्यात पेटलेला वाद शमण्याऐवजी आणखी कडवट वळणावर पोहोचला आहे. भाऊ व मुलाच्या वादात भावाला झुकतं माप देणारे समाजवादी पक्षाचे 'नेताजी' मुलायमसिंह यादव यांच्याशी मुख्यमंत्री अखिलेश यांनी बोलणंच टाकलं आहे.

Maharashtra Times 15 Sep 2016, 12:36 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akhilesh yadav stops all communication with dad mulayam singh yadav
मुख्यमंत्री अखिलेश यांनी वडलांशी बोलणंच टाकलं!


उत्तर प्रदेश सरकारमधील वर्चस्वाच्या वादातून मुलायम सिंह यादव यांचे पुत्र मुख्यमंत्री अखिलेश यादव व बंधू शिवपाल यादव यांच्यात पेटलेला वाद शमण्याऐवजी आणखी कडवट वळणावर पोहोचला आहे. भाऊ व मुलाच्या वादात भावाला झुकतं माप देणारे समाजवादी पक्षाचे 'नेताजी' मुलायमसिंह यादव यांच्याशी मुख्यमंत्री अखिलेश यांनी बोलणंच टाकलं आहे.

यूपीतील निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी अखिलेश यादव यांनी साफसफाई मोहीम सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून अलीकडेच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची हकालपट्टी केली. तसंच, काका शिवपाल यांच्याकडील चार महत्त्वाची खाती तडकाफडकी काढून घेतली. त्यामुळं यादव कुटुंबात अक्षरश: यादवी माजली आहे. हा वाद मिटवण्याची जबाबदारी मुलायमसिंह यांनी यादव कुटुंबातील महत्त्वाचे सदस्य व राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांच्यावर सोपवली आहे. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मुलायम व शिवपाल यांच्या झालेल्या चार बैठकांनंतरही शिवपाल माघार घेण्यास तयार नसल्याचं समजतं.

दुसरीकडं, अखिलेश यांनी कुठल्याही चर्चेला उपस्थित राहण्याचंही टाळलं आहे. मंत्र्यांची हकालपट्टी व शिवपाल यांची खाती कमी करण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत. त्यांनी वडील मुलायम व काका शिवपाल यांच्याशी बोलणंही बंद केलं आहे. अखेरचा उपाय म्हणून मुलायम सिंह यांनी उद्या पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमकं काय होणार? अखिलेश उपस्थित राहणार की नाही? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमर सिंह यांचे हात वर

यादव कुटुंबात बाहेरील लोक हस्तक्षेप करत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला होता. त्यांचा रोख नुकतेच समाजवादी पक्षात परतलेले खासदार अमर सिंह यांच्याकडं असल्याचं बोललं जात होतं. मात्र, अमर सिंह यांनी हा आरोप फेटाळला आहे. 'यादव कुटुंबातील वादाशी माझा अजिबात संबंध नाही. अखिलेश अंगुलीनिर्देश करत असलेली व्यक्ती मी नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज