वृत्तसंस्था, हैदराबाद (तेलंगण)
वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील 'वायएसआर कॉंग्रेस'ने आंध्र प्रदेश विधानसभेत बहुमत मिळवत तेलगु देशम पक्षाला (टीडीपी) धूळ चारली. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना हटवत जगनमोहन ३० मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
राज्यात विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी 'वायएसआर'ने १४९ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी 'टीडीपी'ला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
सरकार बनवण्याच्या हालचालींना वेग आला असून जगनमोहन यांचा शपथविधी ३० मे रोजी होणार असल्याचे पक्षाचे नेते उमारेड्डी व्यंकटेश्वरलू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात २०१४च्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीने १०२ जागा मिळवत सरकार स्थापन केले होते. तेव्हा वायएसआरने ६७ ठिकाणी विजय मिळवला होता.
...
चौकट
...
मोदींकडून अभिनंदन
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशात विजयश्री मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वायएसआर' कॉँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांचे अभिनंदन केले आहे. मोठे यश मिळवल्याबद्दल कौतुक करतानाच मोदींनी त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
...
बलाबल
एकूण जागा - १७५
कल उपलब्ध - १७५
जन सेना - १
टीडीपी - २६
वायएसआरसी - १४५