म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे प्रमुख नेते, आघाडीचे संसदपटू, मोदी सरकारचे संकटमोचक, प्रखर वक्ते, ज्येष्ठ विधिज्ञ आणि क्रिकेट प्रशासक अरुण जेटली यांचे शनिवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ९ ऑगस्टपासून 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यानंतर त्यांची प्रकृती सतत ढासळत गेली आणि दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दोनवेळा सत्ता आणणारा भाजपचा पडद्यामागचा कुशल रणनीतीकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
जेटली यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी संगीता, पुत्र रोहन, कन्या सोनाली बक्षी असा परिवार आहे. आज, रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत जेटली यांचे पार्थिव त्यांच्या ग्रेटर कैलाश येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय मार्ग येथील भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव पक्ष कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी ठेवले जाईल आणि दुपारी २ वाजता निगमबोध घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. जेटली यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांनी आपला परदेश दौरा रद्द करू नये, अशी विनंती जेटली यांच्या कुटुंबीयांनी मोदी यांना केली आहे. जेटली यांच्यावर मे, २०१८मध्ये मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना 'सॉफ्ट टिश्यू कॅन्सर' झाल्याचेही निष्पन्न झाले होते.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जेटली यांचा प्रभाव होता. मोदी यांचे सर्वात निकटस्थ आणि विश्वासू सहकारी म्हणून जेटली यांनी दबदबा प्रस्थापित केला. जेटली यांच्या अर्थमंत्रिपदाच्या पाच वर्षांत नोटाबंदी, जीएसटी, जनधन योजना, थेट रोख हस्तांतरणासारखे अनेक मोठे निर्णय पंतप्रधान मोदी यांना घेणे शक्य झाले. मोदी यांच्या नावावर घेण्यात आलेल्या या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात पडद्यामागून जेटली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अरुण जेटली यांच्या निधनामुळे मी अनेक दशकांचा परिचय असलेला महत्त्वपूर्ण मित्र गमावला आहे. त्यांच्यासारखी अंतर्दृष्टी आणि आकलनशक्ती क्वचितच पाहण्यास मिळते. एक ऊर्जावान विद्यार्थी नेते म्हणून आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचविण्यात ते अग्रेसर होते. - पंतप्रधान नरेंद्र मोदी