वृत्तसंस्था, देहरादून दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा मोडीत काढत गुरुवारी उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाने नवा इतिहास रचला. केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजना, रस्तेबांधणी आणि इतर कामांना मिळालेला वेग तसेच करोनाचे लसीकरण यांचा एकत्रित परिणाम म्हणून भाजपला हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीला केवळ एक वर्ष उरले असताना मुख्यमंत्री बदलण्याचा घेतलेला धाडसी निर्णय, भाजपला मोठे यश देऊन गेला आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेमध्ये माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याविषयी असलेल्या असंतोषाची पक्षनेतृत्वाने वेळीच दखल घेतली. बरोबर एक वर्षापूर्वी, १० मार्च २०२१ रोजी त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तीरथसिंह रावत यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. तीरथसिंह रावत हेही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात तसेच प्रशासनाकडून वेगाने कामे करवून घेण्यात यशस्वी होत नसल्याचे दिसल्यानंतर केवळ चारच महिन्यांत तरुण आणि ऊर्जावान अशा पुष्करसिंह धामी यांची नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. चार महिन्यांत तीन मुख्यमंत्री बदलण्याचा हा प्रयोग भाजपच्या अंगलट येईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, धामी यांनी अत्यंत कौशल्याने कमी वेळात चांगला कारभार केला. पक्षातील विविध गटांना एकत्र ठेवण्यातही ते यशस्वी ठरले. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणाऱ्या भाजपच्या मतांच्या टक्केवारीत फारसा फरक पडलेला नाही. मात्र, २०१७च्या तुलनेत त्यांना काही जागा कमी मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत भाजपला ४६.५१ टक्के मतांसह ५७ जागा मिळाल्या होत्या. यावेळी साधारण ४४.३९ टक्के मतांसह ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. वृत्त लिहेपर्यंत आठ जागांचा निकाल जाहीर व्हायचा होता. केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या मोफत धान्य योजना, करोनाचे लसीकरण तसेच इतर विकासकामांचा मोठा फायदा भाजपला झाला.