अमरावती : जेमतेम चार आमदारांपैकी एका आमदाराने पदाचा राजीनामा देऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आंध्र प्रदेशमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. अकुल सत्यनारायण असे संबंधित आमदाराचे नाव असून, ते राजामहेंद्रावरम (शहरी) या मतदारसंघाचे आमदार होते. अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेना या पक्षात आपण आज (सोमवारी) प्रवेश करणार असल्याचे सत्यनारायण यांनी या वेळी सांगितले. राजीनाम्याचे पत्र आंध्र प्रदेश विधानसभेचे सभापती आणि पक्षाच्या राज्यप्रमुखांकडे पाठवले असल्याचे सत्यनारायण यांनी सांगितले. राजीनाम्यानंतर सत्यनारायण यांनी माध्यमांना आपले निवेदन दिले. मात्र, त्यामध्ये राजीनाम्याचे कारण त्यांनी नमूद केलेले नाही. २०१४मध्ये अकुल यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविली होते. भाजपच्या तिकिटावरून ते निवडूनही आले होते. दरम्यान, जनसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केल्यानंतरच सत्यनारायण राजीनाम्याबाबतचे मौन सोडतील, असे सूत्रांनी सांगितले. भाजपने सत्यनारायण यांना दिलेली आश्वासने न पाळल्याने ते नाराज झाल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.
भाजप आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी
जेमतेम चार आमदारांपैकी एका आमदाराने पदाचा राजीनामा देऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आंध्र प्रदेशमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे...
PTI 21 Jan 2019, 4:00 am