अ‍ॅपशहर

२ कोटी कॅश, ६२ एकर जमीन, १ किलो सोनं; चार भावांकडून लाडक्या बहिणीला ८ कोटींच्या भेटवस्तू

Expensive Wedding Gift: राजस्थानमध्ये लग्नात माहेरच्यांकडून मायरा भरला जातो. यामध्ये पैसे, दागिने बहिणीला दिले जातात. अनेकदा या विधीदरम्यान माहेरचे इतक्या महागड्या भेटवस्तू देतात की ज्याचा तुम्ही विचारही करणार नाही.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2023, 3:30 pm
नागौर: काहीच दिवसांपूर्वी राजस्थानच्या नागौर येथे एका मामाने आपल्या भाचीच्या लग्नात तिला ३ कोटींच्या भेटवस्तू दिल्या होत्या. या घटनेची संपूर्ण देशात चर्चा झाली होती. मात्र, आता ४ भावांनी हा रेकॉर्डही मोडून काढला आहे. नागौरच्या खिंवसर तालुक्यातील धिगसरा गावातील रहिवासी असलेल्या चार भावांनी आपल्या बहिणीला ८ कोटी ३१ लाख रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत. हे सारं मायरा भरणे या विधीनुसार दिलं गेलं आहे. भगीरथ मेहरिया, अर्जुन मेहरिया, प्रल्हाद मेहरिया आणि उम्मेद जी मेहरिया यांनी त्यांची बहीण भंवरीला ८ कोटी २१ लाखांचा मायरा दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rajasthan Maira Bharan


राजस्थानच्या नागौरचा जयल तहसीलमध्ये मायरा भरण्याची पद्धत सुलतानी काळापासून सुरु आहे. येथेच काही काळापूर्वी दोन भावांनी आपल्या बहिणीला डॉलर्सने सजवलेली ओढणी आणि एक कोटींचा मायरा दिला होता. तर बुरडी गावातील रहिवासी भंवरलाल चौधरी यांनी ३ कोटी २१ लाखांचा मायरा भरला होता. मात्र, या चार भावांनी हे सारे रेकॉर्ड आता मोडीत काढले असून, सध्या भगीरथ मेहरियाच्या कुटुंबाने ८ कोटी १ लाख रुपयांचा मायरा भरला आहे.


रविवारी पुन्हा नागौरच्या जाटांनी इतिहास रचला आहे. नागौरमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठा मायरा भरला गेला आहे. ढीगसरा येथील मेहरिया कुटुंबाने आपली बहीण भंवरी देवी रायधानूला ८ कोटी ३१ लाखांचा मायरा भरला आहे. यामध्ये २ कोटी २१ लाखांची रोख रक्कम, ७१ लाख किमतीचं १ किलो १०५ ग्रॅम वजनाचं सोनं, ९ लाख ८० हजार किमतीची १४ किलो चांदी, यामध्ये २ किलो चांदी बहिणीला देण्यात आली आणि उर्वरित ८०० नाणी संपूर्ण गावाला वाटण्यात आली आहे.

बापरे! डास चावल्याने महिला थेट कोमात, जीव वाचवण्यासाठी हात-पाय कापावे लागले...
एवढंच नाही तर ४ कोटी २४ लाख किमतीची ६२ एकर जमीन आणि गुढा भगवान दास येथे ५० लाखांचा प्लॉट, गुढा भगवान दास येथे जमीन आणि ७ लाख किमतीची गहूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली याचाही त्यात समावेश आहे.

मायरा भरणं म्हणजे काय?

या सर्व भेटवस्तू लग्नातील 'मायरा' या विधीदरम्यान देण्यात आल्या आहेत. राजस्थानमध्ये लग्नाच्या वेळी मायरा हा विधी आहे. या विधीमध्ये, जेव्हा बहिणीच्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न असते, तेव्हा तिचा भाऊ त्यांना कपडे, दागिने इत्यादी अनेक भेटवस्तू देतो. तसेच बहिणीच्या सासरच्यांनाही भेटवस्तू देतो. यापूर्वीही नागौरमध्ये लग्नात लाखो रुपयांचा मायरा भरल्याचं समोर आलं आहे.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख