- दररोज २७ किमी रस्त्याचे बांधकाम
- देशांतर्गत हवाई प्रवाशांची संख्या दुप्पट
- 'सागरमाला'ला मिळणार गती
..
महामार्गांच्या उभारणीमध्ये भारताने वेगवान प्रगती केली असून दररोज २७ किमी लांबीच्या महामार्गांची उभारणी केली आहे. रेल्वे असो की जलमार्ग, हवाई मार्ग वा डिजिटल मार्ग, पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी केला.
ते म्हणाले, दिल्ली परिसरातील पूर्व महामार्ग, आसाममधील बोगीबिल पूल यांसारखे कित्येक दशके रखडलेले प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पायाभूत सुविधा हा कोणत्याची देशाचा आधार असून पुढील आठ वर्षांमध्ये १० लाख कोटी अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे, रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, शहरी वाहतूक, नैसर्गिक वायू, देशांतर्गत जलमार्ग या सर्वच पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.
'उडान' योजनेमुळे सामान्य नागरिकही विमानाने प्रवास करू लागला असून देशातील कार्यन्वित विमानतळांची संख्या शंभरावर गेली आहे. गेल्या पाच वर्षांत देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे. सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला तसेच देशांतर्गत जलमार्गांच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे, असे गोयल म्हणाले.
ईशान्य भारतासाठी अर्थसंकल्पीय तरतूद २१ टक्क्यांनी वाढवून २०१९-२०मध्ये ५८,१६६ कोटी करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश प्रथमच विमान वाहतुकीच्या नकाशावर आला असून मेघालय, त्रिपुरा, मिझोरम प्रथमच रेल्वेने जोडले गेले आहेत.
..
हा अर्थसंकल्प ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. गरीब, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प आहे. ४० ते ५० लाख लोकांना याचा थेट फायदा होईल. महामार्गांसाठीची तरतूद ८३,००० कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय महामार्ग मंत्री