अ‍ॅपशहर

जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात राजधानी दुमदुमली..

महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ३८९ वी जयंती अत्यंत जल्लोषात आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. तर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि मराठा लाइट इन्फॅन्ट्रीचे लेफ्टनंट जनरल पन्नू हे प्रमुख अतिथी होते.

चित्ततोष खांडेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2019, 8:19 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivaji


महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ३८९ वी जयंती अत्यंत जल्लोषात आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. तर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि मराठा लाइट इन्फॅन्ट्रीचे लेफ्टनंट जनरल पन्नू हे प्रमुख अतिथी होते.

आज सकाळी आठ वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी कस्तुरबा गांधी रोडवरील महाराष्ट्र सदन येथे गर्दी केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलाकारांनी या शिवजन्मोत्सवाला हजेरी लावली. नाशिक, कोल्हापूर, पुणे, डोंबिवलीहून आलेल्या ढोल ताशा पथकांनी वाद्यांच्या गजरात दिल्लीकरांचे लक्ष वेधले. उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेल्या बाल वारकऱ्यांनी टाळ, झांजा वाजवल्या आणि भजनंही गायली. यावेळी अनेक विद्यार्थिंनीनी लेझीमची प्रात्यक्षिकही केली. महाराष्ट्र सदनाच्या आवारात ९ वर्षाच्या बालकापासून ८५ वर्षांच्या वृद्धापर्यंत अनेक 'तरुणांनी' लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा इत्यादी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके केली.

छत्रपती संभाजीराजांच्या आगमनानंतर महाराष्ट्र सदन ते इंदिरा गांधी कला केंद्रापर्यंत शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण आणि स्थानिक महिलाही या मिरवणुकीत सहभागी झाल्या. महाराष्ट्रातून आलेल्या मल्लखांबपटूंनी या मिरवणुकीदरम्यान मल्लखांबाची प्रात्यक्षिके केली. छोट्या पडद्यावर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनु मोघे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेषात हत्तीवर अंबारीत बसून या मिरवणुकीत सहभागी झाले.

पुलवामाच्या शहिदांना श्रद्धांजली...

पाच दिवसांपूर्वी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांना हा उत्सव समर्पित असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली. इंदिरा गांधी कला केंद्रात महाराजांची पालखी पोहोचल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुमित्रा महाजन, लेफ्टनंट जनरल पन्नू यांनी भूषवले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुलं वाहून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले, सुमित्रा महान आणि ले.जनरल पन्नू यांनी उपस्थितांना संबोधित केले.

शिवजन्मोत्सव विश्वोत्सव व्हावा

शिवजन्मोत्सव महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय उत्सव आणि त्याहीपेक्षापुढे जाऊन विश्वोत्सव व्हावा, अशी इच्छा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राशिवाय इतर प्रांतातूनही युवक दिल्लीतील जन्मोत्सवात सहभागी व्हावेत, असंही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला हवे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ताराराणींचा इतिहास लिहिला जावा

औरंगजेबाशी सात वर्षं लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई महाराणी ताराबाई यांच्याबद्दल मात्र जास्त लेखन झालेले नाही, अशी खंत सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केली. त्यांचा इतिहास विस्तृतपणे पुस्तक स्वरुपात लिहिला जावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवचरित्राची ज्योत आज देशातील प्रत्येकाच्या मनामनात पेटायला हवी, असंही त्यांनी सांगितलं. शिवाजीसारखा पुत्र घडण्यासाठी महिलांनी जिजाऊंसारख्या आई होणं गरजेचं आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज