अ‍ॅपशहर

चीनी पूर्ण तयारीने आले; भारतीय जवानांनीही दंड थोपटले

विश्वासघात करुन वार करण्याची चीनची चाल सुरूच आहे. यापूर्वी भारतीय सैनिकांवर हल्ला करणाऱ्या चीनने पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला. पण सावध असलेल्या भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2020, 2:34 pm
नवी दिल्ली : भारतीय जवानांनी चीनच्या आर्मीचा घुसखोरीचा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडला आहे. शनिवारी पँगाँग सरोवराजवळ चीनच्या सैन्याकडून पूर्ण तयारीनिशी घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भारतीय सैन्याने तेवढ्याच आक्रमकतेने उत्तर देत चीनला पिटाळून लावलं, अशी माहिती सूत्रांनी दिली. चीनने घुसखोरीचा प्रयत्न केलेलं हे नवं क्षेत्र आहे. पाच वेळा चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने वाद निवळण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india china
प्रातिनिधिक फोटो


सूत्रांच्या माहितीनुसार, चीनच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात फौज घेऊन पँगाँग सरोवराच्या दक्षिण बाजूकडून पश्चिमेकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या क्षेत्रावर ताबा मिळवणं हा चीनचा मुख्य हेतू होता, असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

जवान तर भारतमातेचे रक्षण करत आहेत, मात्र मोदी 'लाल आँख' कधी दाखवणार?: काँग्रेस

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चीनने पुरेसं सैन्य घेऊन घुसखोरी केली होती. पण याची माहिती मिळताच अगोदरच शत्रूविरोधात दंड थोपटून उभं असलेलं भारतीय सैन्य अधिक आक्रमक झालं आणि चीनच्या सैनिकांना परतवून लावलं. दरम्यान, यावेळी कोणतीही झटापट झालेली नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

अगोदरपासूनच भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असलेल्या सैन्याने चीनची ही घुसखोरी हाणून पाडली. दुसरीकडे चीननेही आपल्या बाजूने सैन्य तैनात केलं आहे. पण या भागात चीनने कोणतंही बांधकाम केलेलं नसल्यामुळे वाहनांची ये-जा शक्य नव्हती.

गलवान हिंसेतील चीनी सैनिकांच्या मृत्यूचं सत्य समोर आल्यानं चीनची फडफड?

भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या या संघर्षाबाबत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैनिकांनी दोन्ही देशांदरम्यानच्या बैठकांमध्ये सहमती झालेले मुद्दे बाजूला सारत पुढे सरकरण्याचा प्रयत्न केला. पँगाँग सरोवराच्या (Pangong lake clash) दक्षिणेकडील किनाऱ्यावर चीनी सैनिकांच्या (PLA Army) हालचालींचा भारतीय सैनिकांनी विरोध केला. प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना पुढे येऊ दिले नाही. या घटनेनंतर भारताने या परिसरात सैनिकांची तैनाती वाढवली आहे. या संघर्षानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावरील बैठक सुरू आहे. १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेनंतर सीमेवर झालेली ही दुसरी सर्वात मोठी घटना आहे. भारताचे सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज