अ‍ॅपशहर

नागरिकत्व विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर

बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे एक तास तपशीलवार भाषण केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2019, 9:50 am
नवी दिल्ली: बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सुमारे एक तास तपशीलवार भाषण केले. विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढत हे विधेयक देशातील अल्पसंख्याकांविरुद्ध नसल्याचे शहा यांनी ठासून सांगितले. शहा यांच्या उत्तरानंतर विधेयकावर मतदान घेण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम loksabha


नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पटलावर मांडले जावे की मांडले जाऊ नये यावर सर्वप्रथम मतदान घेण्यात आले. यात २९३ सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने कौल दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकावर तब्बल १२ तास वादळी चर्चा झाली. काँग्रेसने विधेयकाचा कडाडून विरोध केला. एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तर हे विधेयक म्हणजे देशाची दुसरी फाळणी करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप करत विधेयकाची प्रत सभागृहात फाडली. हा प्रकार कामकाजातून वगळण्यात आला. दरम्यान, वादळी चर्चेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेला उत्तर दिले.

ओवेसी भडकले; नागरिकत्व विधेयक फाडले!

शहा यांनी सुमारे एक तास भाषण केले. शहा यांनी विरोधकांचे सगळे मुद्दे खोडून काढत विधेयक किती विधायक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. घुसखोर आणि निर्वासित यांच्यात फरक आहे व ती रेषा स्पष्ट करण्यासाठीच हे विधेयक आणण्यात आले आहे. या विधेयकाने निर्वासितांना न्याय मिळणार आहे. स्वधर्माच्या रक्षणासाठी जो निर्वासित भारतात आश्रयाला आला आहे, त्याला हे विधेयक न्याय देणार आहे, असा दावा शहा यांनी केला. शहा यांच्या उत्तरानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकावर मतदान प्रक्रिया सुरू केली. विधेयकात सभागृहाने सूचविलेल्या प्रत्येक दुरुस्तीवर आवाजी मतदान घेण्यात आले.

...तर देशाची लोकसंख्या वाढेल; शिवसेनेचा इशारा

सर्व सुधारणांवर आवाजी मतदान घेण्यात आल्यानंतर 'हे विधेयक संमत करण्यात यावे', असा प्रस्ताव अमित शहा यांनी मांडला. त्यावर प्रथम आवाजी मतदान घेण्यात आले व त्यानंतर सदस्यांच्या मागणीनुसार मतविभाजन घेण्यात आले आणि ३११ विरुद्ध ८० मतांनी हे दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले.

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी हा मोठा विजय मानला जात असून नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची आता खरी परीक्षा राज्यसभेत होणार आहे. सत्ताधारी एनडीएकडे राज्यसभेत बहुमत नसल्याने तिथे हे विधेयक मंजूर करण्यात सरकारला यश मिळतं का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकरांचाच: काँग्रेस

पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. सभागृहात उपस्थित झालेल्या प्रत्येक आक्षेपावर समाधानकारक उत्तर दिल्याबद्दल पंतप्रधानांनी गृहमंत्री शहा यांचे कौतुक केले. भारताच्या परंपरांना अनुसरूनच हे विधेयक आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. या विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व सदस्यांचे मोदींनी आभार मानले.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज