अ‍ॅपशहर

नागरिकत्वावरून भडका!

आसाममधील ४० लाखांहून अधिक लोकांना अवैध ठरविणाऱ्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या अंतिम मसुद्यावरून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या विधानानंतर मंगळवारी राज्यसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात संघर्षाचा भडका उडाला.

महाराष्ट्र टाइम्स 1 Aug 2018, 5:16 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम agitation


आसाममधील ४० लाखांहून अधिक लोकांना अवैध ठरविणाऱ्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या अंतिम मसुद्यावरून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या विधानानंतर मंगळवारी राज्यसभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात संघर्षाचा भडका उडाला. ‘आमच्यामध्ये हिंमत आहे, म्हणून आम्ही हा मुद्दा हाती घेतला. बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे आव्हान देत अमित शहा यांनी हा मुद्दा संसदेबाहेरही तापविला.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या आग्रहावरून सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) विषय चर्चेला घेतला. आझाद यांच्यासह राष्ट्रवादीचे माजीद मेमन व इतरांनी आपली भूमिका मांडली. नंतर शहा यांच्या भाषणावर गोंधळ झाला. '१४ ऑगस्ट १९८५ रोजी राजीव गांधी यांनी केलेला आसाम करार हाच राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा आत्मा होता. काँग्रेसच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या पुढाकाराची अंमलबजावणी करण्याची कुणाची हिंमत नव्हती. आमच्यात हिंमत आहे. म्हणून आम्ही हे काम हाती घेतले आहे', असे ते म्हणाले. पुढे, 'तुम्ही कोणाला वाचवू इच्छिता? बांगलादेशी घुसखोरांना?' असा प्रश्न अमित शहा यांनी विरोधकांना उद्देशून केल्याने विरोधी सदस्य भडकले आणि त्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येऊन गोंधळ घालून शहांच्या भाषणात व्यत्यय आणला. या गोंधळामुळे आधी दहा मिनिटांसाठी व पुढे दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे राज्यसभेत अपूर्ण राहिलेले निवेदन अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद बोलावून पूर्ण केले. 'राष्ट्रीय नागरिक नोंदणीतून कोणत्याही भारतीयाचे नाव कापले जाणार नाही. ही प्राथमिक यादी असून त्यात दुरुस्त्या,आक्षेप शिल्लक आहेत', असे त्यांनी नमूद केले. 'राहुल गांधी यांनी याप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करावी', असे आवाहन अमित शहा यांनी केले. ममता बॅनर्जी व्होटबँकेचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

गृहयुद्ध पेटेल : ममतांचा इशारा

'आसामप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा प्रयत्न झाल्यास गृहयुद्ध पेटेल आणि संपूर्ण भारतात रक्तपात होईल', अशा इशारा मंगळवारी दिल्लीत दाखल झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला. बॅनर्जी यांनी ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आज, बुधवारी त्या काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटण्याची शक्यता आहे.

३९ बांगलादेशी मायदेशी

नवी दिल्ली : आसाममध्ये बेकायदा आलेल्या बांगलादेशी नागरिकांपैकी केवळ ३९ जणांनाच गेल्या दोन वर्षांत मायदेशी परत पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. उर्वरितांना कायदेशीर बाबी लवकरात लवकर पूर्ण करून परत पाठवण्यात यावे, यासाठी आसाम सरकारला सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

‘त्यांना गोळ्या घाला’

हैदराबाद : बेकायदा बांगलादेशी स्थलांतरित तसेच रोहिंग्या निर्वासित हे सरळपणे आपल्या मायदेशी परत गेले नाहीत, तर त्यांना गोळ्या घाला,’ असे वादग्रस्त वक्तव्य तेलंगणमधील भाजप आमदार टी. राजा सिंह लोध यांनी मंगळवारी केले.

‘रोहिंग्यांचा प्रवेश रोखण्यासाठी सीमेवर सतर्कता’

भारतात रोहिंग्यांना प्रवेश करणे शक्य होऊ नये म्हणून सीमा सुरक्षा दल आणि आसाम रायफल्सना सतर्क करण्यात आले असल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. आपल्या राज्यात किती रोहिंग्या आहेत, याची नेमकी माहिती घेऊन त्यांच्यावर नजर ठेवण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. म्यानमारने १९८२ मध्ये नागरिकत्व देण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशमार्गे भारतात आलेले रोहिंग्या जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, हैदराबाद आणि मुंबईतही पसरले असून जम्मू आणि काश्मीरमधील सहा हजार रोहिंग्यांना सर्वप्रकारच्या सुविधा मिळत असल्याचा दावा लोकसभेत हा प्रश्न उपस्थित करताना अरविंद सावंत यांनी केला. रोहिंग्यांनी दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे काय, असा सवालही त्यांनी केला. देशात असलेल्या रोहिंग्यांना कुठेही येण्या-जाण्याची मुभा देऊ नये, त्यांची सर्व माहिती तसेच बायोमेट्रिक पण घेण्यात यावे, अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या जात असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज