अ‍ॅपशहर

आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्यांची संपत्ती जप्त करू: योगी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून उत्तर प्रदेशातही आगडोंब उसळल्याने आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार घडवणाऱ्या समाजकंटकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सक्त ताकीद दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2019, 12:00 am
लखनऊ: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून उत्तर प्रदेशातही आगडोंब उसळला असून आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार घडवणाऱ्या समाजकंटकांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सक्त ताकीद दिली आहे. नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात ज्यांनी हिंसाचार घडवून आणला, अशा व्यक्तींची ओळख पटववून त्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल व या संपत्तीचा लिलाव करून ती रक्कम हिंसाचारात आर्थिक नुकसान झालेल्यांना भरपाई म्हणून दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंदोलनाच्या नावावर कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogi-adityanath


उत्तर प्रदेशात विविध भागांत आंदोलनाच्या नावाखाली काही समाजकंटकांनी सरकारी मालमत्तेचे व खासगी मालमत्तेचे नुकसान केले आहे. याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेल्या पैशांतून या हिंसाचारात ज्यांचं आर्थिक नुकसान झालंय, त्यांना भरपाई देण्यात येईल, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

लखनऊ शहरातील विविध भागांत आज नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने दोन पोलीस चौक्या पेटवून दिल्या. तसेच पोलीस ठाण्याबाहेरची वाहनेही जाळण्यात आली. संतप्त आंदोलकांनी मीडियाच्या ओबी व्हॅनलाही आग लावली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

CAA: लखनऊमध्ये दोन पोलीस चौक्या जाळल्या

आज लखनऊच्या परिवर्तन चौकात काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी पोलिसांनी जमावावर जोरदार लाठीमारही केला. त्यात अनेक लोक जखमी झाले. यावेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत अनेक ट्रॅफिक पोलिस जखमी झाले. शहरातील विविध भागांत एकाचवेळी हिंसक निदर्शने सुरू झाल्याने स्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. हजरतगंज भागात निदर्शकांनी मीडियाची ओबी व्हॅनही जाळली. दुसरीकडे संभल भागातही निदर्शक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. त्यानंतर तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. लखनऊसह इतर जिल्ह्यातही आंदोलनाचं लोण पसरल्याने योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.


CAA: लेखक रामचंद्र गुहा पोलिसांच्या ताब्यात

CAA आंदोलन; प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे दिल्ली ठप्प

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज