वृत्तसंस्था, बेंगळुरू
माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांचा नातू निखिल कुमारस्वामी देशभरात लॉकडाउन असतानाही शुक्रवारी बोहल्यावर चढला. लॉकडाउन असल्याने विवाहस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन करूनही नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली. देशात जमावबंदी असताना लग्नकार्य करण्यात आल्याबद्दल विविध स्तरांतून टीका केली जात आहे.
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुत्र असलेल्या निखिलने कर्नाटकचे माजी गृहनिर्माणमंत्री एम. कृष्णप्पा यांची नातेवाईक रेवती हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. जनता दल (धर्मनिरपेक्ष)चा बालेकिल्ला असलेल्या रामनगर जिल्ह्यातील बिदादी येथील कुमारस्वामी यांच्या केखागनाहल्ली फार्महाऊसवर हा सोहळा पार पडला.
रामनगर येथील भाजपचे जिल्हाध्यक्ष एम. रुद्रेश यांनी या विवाहसोहळ्यावर सडकून टीका केली. 'करोनाची मोठ्या प्रमाणात बाधा झालेल्या भागांत मदत पोहोचवू पाहणाऱ्या समाजसेवकांच्या वाहनांना परवानगी दिली जात नसताना, या विवाहसोहळ्यासाठी १५० ते २०० गाड्या नेण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आत्तापर्यंत रामनगरमध्ये एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. मात्र यापुढे कुणाला लागण झाल्यास त्याला देवेगौडा कुटुंब जबाबदार असेल', असे रुद्रेश म्हणाले. जिल्ह्याचे पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन अशा सोहळ्याला परवानगी कशी देण्यात आली, याबाबत विचारणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे विधान परिषदेचे सदस्य टी. ए. शर्वना यांनी या सोहळ्यात लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याच्या आरोपाचे खंडन केले आहे. लग्नविधीवेळी व्यासपीठावर केवळ आठ जण होते व या सोहळ्यादरम्यान सुरक्षित वावराचे पूर्णपणे पालन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पक्षाचे आणखी एक नेते एन. एच. कोनारड्डी यांनीही या कार्यक्रमात सर्व नियमांचे पालन करण्यात आल्याचा पुनरुच्चार केला.
दरम्यान, लॉकडाउन असल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते, नातेवाईक व हितचिंतकांना विवाहसोहळ्यात गर्दी न करण्याचे आवाहन कुमारस्वामी यांनी एका व्हिडीओद्वारे या आठवड्याच्या सुरुवातीला केले होते. मात्र तरीही नागरिकांनी गर्दी केल्याचे सांगण्यात आले.