वृत्तसंस्था, बेंगळुरू
कर्नाटकातील आगामी पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू असली, तरी उमेदवार निवडीच्या मुद्द्यावरून पक्षामध्ये असलेले मतभेद गुरुवारी झालेल्या बैठकीत उघड झाले.
काँग्रेस निवडणूक समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. या बैठकीत राज्याच्या नेतृत्वाच्या 'एकछत्री अमला'बद्दल काही ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त करून लोकसभेत पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी कोणाची असेल, हे ठरवून द्यावे, अशी मागणीही केली. कर्नाटक काँग्रेस कमिटीचे प्रमुख दिनेश गुंडू राव आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या या दोघांवर बैठकीमध्ये थेट हल्ला करण्यात आला. दरम्यान, 'आम्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एक-दोन दिवसांत उमेदवार यादी जाहीर केली जाईल,' अशी माहिती वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर दिली.
वेणुगोपाल म्हणाले, 'आम्ही प्रत्येक जागेसंबंधी विस्तृत चर्चा केली आहे. ज्या गोष्टींवर चर्चा केली आहे, त्या गोष्टी उमेदवार निवड करताना आम्ही लक्षात घेऊ. या संबंधात आम्ही आमच्या नेत्यांशी व स्थानिक नेत्यांशी चर्चा करू आणि नंतर उमेदवार जाहीर करू.' दरम्यान, 'उमेदवारांची अंतिम यादी आम्ही शुक्रवारी संध्याकाळी अथवा परवा सकाळी जाहीर करू,' अशी माहिती गुंडू राव यांनी दिली. काँग्रेस आघाडी सर्व जागांवर निवडणूक लढवेल. काही जागांसाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे, तर काही जगांसाठी एकच नाव चर्चेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकात १५ मतदारसंघांसाठी २१ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होत आहेत. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या दोन पक्षांनी निवडणुकीसाठी आघाडी केली असून, काँग्रेस १२ जागा, तर धर्मनिरपेक्ष जनता दल तीन जागा लढवणार आहे.
निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी
नवी दिल्ली : कर्नाटकातील १५ मतदारसंघांसाठी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलाव्यात असे निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. कर्नाटकातील १७ अपात्र आमदारांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी केलेल्या याचिकेला आवाहन देणाऱ्या याचिकांवर विचार केला जाईल, असे न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केल्यानंतर निवडणूक आयोगाने निवेदन दिले. या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर निर्णय दिला जाईल, असे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि कृष्ण मुरारी यांनी सांगितले.