'महाराष्ट्र सरासरीपेक्षा मागे'
'महाराष्ट्राला आत्तापर्यंत करोना लसीचे १ कोटी ०६ लाख १९ हजार १९० डोस पुरवण्यात आले आहेत, परंतु एव्हाना केवळ ९० लाख ५३ हजार ५२३ करोना लसीच्या डोसचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये लसीच्या अपव्ययाचाही समावेश आहे. महाराष्ट्रात पहिला डोस ८५.९५ टक्के आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आला तर दुसरा डोस केवळ ४१ टक्के लोकांना देण्यात आलाय. तर दुसरीकडे देशातील सरासरी ५१ टक्क्यांहून अधिक आहे' असं मनोहर अगनानी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
करोना योद्ध्यांनाही करोना लसीचा दुसरा डोस देण्यात महाराष्ट्र देशाच्या सरासरीपेक्षा मागे असल्याचं केंद्रानं म्हटलंय. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
दिल्ली आण पंजाबमधील परिस्थिती
महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीलाही एव्हाना २३ लाख ७० हजार ७१० डोस देण्यात आले आहेत. यातील केवळ १८ लाख ७० हजार ६६२ डोस वापरण्यात आले आहेत. यामध्येही अपव्ययाचा समावेश आहे. दिल्ली आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि दुसरा डोस देण्याच्या बाबतीत राष्ट्रीय सरासरीहून मागे आहे. पंजाबमध्येही आतापर्यंत २२ लाख ३६ हजार ७७० डोस पाठवण्यात आले आहे. यातील केवळ १४ लाख ९४ हजार ६६३ डोस वापरण्यात आल्याचं केंद्रानं म्हटलंय.
लस तुडवड्याचा राज्यांचा आरोप
संबंधित राज्यांना आपल्या लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी यांचं लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. कारण या लढाईत ते सर्वात पुढे आहेत, असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आपल्या पत्रात म्हटलंय. या अगोदर महाराष्ट्रासहीत काही राज्यांनी केंद्रावर लसीकरण पुरवठा मंदावल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेशच्या म्हणण्यानुसार राज्यात लसींचा तुटवडा जाणवतोय. आपल्याकडे केवळ काही दिवसांचा लसींचा स्टॉक उपलब्ध असल्याचंही या राज्यांनी केंद्राला कळवलं होतं
सातारा, पुणे, पनवेलमध्ये लसीकरण थांबलं
महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत गंभीर दिसतेय. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लसीचा साठा उपलब्ध नसल्यानं पुण्यातील १०९ लसीकरण केंद्र बंद राहिल्याचं म्हटलं. बुधवारी रात्री महाराष्ट्रातील साताऱ्यातही लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण मोहीम थांबवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. साताऱ्यात आतापर्यंत जवळपास २.६ लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसंच लसीचा तुटवडा भासत असल्यानं लसीकरण मोहीम थांबवल्याची सूचना पनवेल महानगरपालिकडून देण्यात आली.
महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांची केंद्राला विनंती
महाराष्ट्राचे आरोग्या मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या दाव्यानुसार, बुधवारी राज्यात करोना लसीचे केवळ १४ लाख डोस उरले आहेत, हे येत्या तीन दिवसांत वापरले जातील. महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी ५ लाख लोकांना लस दिली जात असेल तर येत्या आठवड्यासाठी ४० लाख डोसची आवश्यकता राहील. महाराष्ट्रातील अनेक लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्यानं नागरिकांना लस न घेताच माघारी जावं लागत असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं लवकरात लवकर लसीचा पुरवठा करण्याची विनंतीही राजेश टोपे यांनी केली होती.
महाराष्ट्र करोना संक्रमणानं बेजार
देशात महाराष्ट्र हे करोना संक्रमणाच्या सर्वाधिक प्रभावित राज्य ठरलंय. बुधवारी राज्यात जवळपास ६० हजार लोक करोना संक्रमित आढळले. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एव्हाना ३१ लाख ७३ हजार २६१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ५ लाख ०१ हजार ५५९ जणांवर उपचार सुरू आहेत तर ५६ हजार ६५२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.