सहारणपूर : भाजप नेते गिरीराज सिंह यांनी देवबंद शहराला 'दहशतवादाची गंगोत्री' संबोधल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदसारखे दहशतवादी येथून आले, असेही विधान सिंह यांनी केले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) देवबंद येथे विरोध झाल्याबद्दल विचारले असता त्यांनी वरील विधान केले. 'सीएए'च्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते सहारणपूर येथे आले होते. ते म्हणाले, 'देवबंद ही दहशतवादाची गंगोत्री आहे, असे मी एकदा म्हणालो होतो. हाफीज सईदसारखे क्रूरकर्मा दहशतवादी येथूनच आले.' 'सीएए'ला विरोध करण्यासाठी चाललेली निदर्शने देशविरोधी असल्याचेही ते म्हणाले. जेएनयूचा विद्यार्थी शर्जिल इमाम याच्या देशविरोधी वक्तव्याचा आधार घेऊन ते म्हणाले, 'ही आंदोलने देशविरोधी असून खिलाफत आंदोलनासारखी आहेत.'
'देवबंद'वरील वक्तव्याने वाद
भाजप नेते गिरीराज सिंह यांनी देवबंद शहराला 'दहशतवादाची गंगोत्री' संबोधल्याने नवा वाद निर्माण झाला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Feb 2020, 4:00 am