वृत्तसंस्था, नवी दिल्ली
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी केल्यावरून वाद सुरू असतानाच काँग्रेसने क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनाही 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
काँग्रेसने पंतप्रधानांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. 'हुतात्मा भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्षमय प्रतिकार केला. ब्रिटिशांनी त्यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली. या महान क्रांतिकारकांनी संपूर्ण एका पिढीला देशभक्तीने प्रेरित केले आहे. त्यांना २६ जानेवारी २०२० रोजी भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे. या तीन महान क्रांतिकारकांना सरकारने अधिकृतपणे 'शहीद ए आझम' पुरस्कार देऊन सन्मानित करावे; तसेच मोहालीतील चंडीगड विमानतळाचे नामकरण 'शहीद ए आझम भगतसिंग विमानतळ, चंडीगड' असे करण्यात यावे,' असे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यास स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले होते, तर 'एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 'भारतरत्न' देण्यात यावा, अशी मागणी केली होती.