लखनऊ : बाबरी मशीद पडल्याचा दिवस 'शौर्य दिवस' म्हणून साजरा करू नका, असे आवाहन राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिल्यामुळे हा दिवस साजरा करणे प्रसंगोचित नाही, असे महंत यांनी सांगितले. न्यायालयाच्या निकालानंतर नागरिकांनी शांतता आणि सौहार्दाचे दर्शन घडवले, तशाच पद्धतीने ६ डिसेंबरला कोणताही कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. नागरिकांनी एकात्मतेचा संदेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
..
हरयाणामध्ये खाण गैरव्यवहार?
चंदीगड ः हरयाणामध्ये आधीच्या भाजप सरकारच्या काळात सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा खाण गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी कॅगच्या अहवालाचा संदर्भ यासाठी दिला आहे. राज्याच्या विधानसभेत नुकताच हा अहवाल मांडण्यात आला होता. हरियाणातील खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाला १,४७६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अनियमिततांमुळे हा तोटा झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.