राहुल गांधींची मागणी, मोदी सरकारचे वर्तन सावकारासारखे
म.टा.विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली
'रस्त्यावरून चालणाऱ्या श्रमिकांना कर्जाची नव्हे; तर पैशाची गरज आहे. मोदी सरकारने सावकारासारखे वागू नये. शेतकरी आणि श्रमिकांच्या हातात सरकारने पैसा द्यावा,' अशी मागणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमधील तरतुदींमुळे देशात भ्रमाची स्थिती निर्माण होऊन प्रत्येक नागरिकामध्ये अस्वस्थता वाढली आहे. या पॅकेजमुळे सरकारची विश्वासार्हता घटली आहे,' अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी आज रस्त्यावर उतरून दिल्लीतील सुखदेव विहारमधील स्थलांतरित कामगारांशी संवाद साधला आणि त्यांना गाड्यांमधून घरी पोहोचवून देण्याविषयी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निर्देश दिले. तत्पूर्वी, 'खिशात पैसा नसताना काय खावे असा प्रश्न जनतेला पडला आहे. मोदी सरकारने राज्यांच्या, केंद्राच्या किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांना पैसा द्यावा आणि ज्येष्ठ व छोट्या मुलांचा विचार करून लॉकडाउन सावधतेने शिथील करावा,' अशा सूचना राहुल गांधी यांनी शनिवारी प्रादेशिक माध्यमांशी संवाद साधताना केल्या.
'देशव्यापी लॉकडाउनमुळे आपल्या गावी पायी चालत जाण्यास मजबूर झालेल्या श्रमिकांना कसा दिलासा मिळेल हे सरकारला सांगता आलेले नाही. अवकाळी पाऊस आणि लॉकडाउनमुळे हमी भावात आपले धान्य विकू न शकलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेजमुळे काहीही मिळालेले नाही. तीच अवस्था सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांची झाली आहे. त्यांना आर्थिक महामारीशी झुंजण्यासाठी केवळ कर्ज घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १३ कोटी गरिबांना आर्थिक साह्य, मनरेगातील कामाचे दिवस १०० वरून दोनशे करणे, शहरी भागात मनरेगासाठी योजना राबविणे, सार्वजनिक वितरण प्रणालीबाहेरच्या ११ कोटी लोकांना अन्नसुरक्षा प्रदान करणे, ८.२२ कोटी शेतकऱ्यांना १० हजारांचे तात्काळ अर्थसाह्य करणे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी एक लाख कोटी रुपयांची वेतन संरक्षण योजना आणि गरजेनुसार पतहमी योजना लागू करणे, मोठ्या उद्योगांनाही याच योजना लागू करणे, हॉटस्पॉट वगळता देशातील सात कोटी दुकानदारांना आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देणे आणि स्थलांतरित श्रमिकांना निःशुल्क घरी पोहोचविण्याची व्यवस्था करणे,' अशा मागण्या राहुल गांधी यांनी मोदी सरकारकडे केल्या आहेत.
राहुल गांधी म्हणाले, 'परदेशी संस्था काय म्हणतात याकडे सरकारने लक्ष देऊ नये. आपल्या छोट्या आणि मध्यम उद्योगांवर विश्वास ठेवावा. आपली जनता, शेतकरी, कामगार यांच्यावर विश्वास ठेवावा आणि कोणताही विचार न करता त्यांच्या खिशात थेट पैसे द्यावेत. जर आपण त्यांना पैसे दिले नाहीत तर आपली अर्थव्यवस्था सुरूच होणार नाही. मग रेटिंगचा प्रश्नच येणार नाही. म्हणूनच सरकारने लोकांच्या बँक खात्यांत पैसे जमा केले पाहिजेत. पंतप्रधानांनी किमान तात्पुरती तरी काँग्रेसने आणलेली 'न्याय' (किमान उत्पन्न हमी योजना) योजना लागू केली पाहिजे. लोकांच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत तर देशावर अक्षरश: भयंकर परिणाम होतील.
राहुल कोट
अर्थव्यवस्थेपुढे वादळ घोंगावत असून,त्याचा अनेकांना फटका बसणार आहे. पंतप्रधानांनी आर्थिक पॅकेजचा फेरविचार करावा आणि रस्त्यावरून चालणाऱ्या श्रमिकांच्या हातात पैसे द्यावेत. तसे झाले नाही, तर करोनापेक्षा अर्थव्यवस्थेचे अधिक नुकसान होईल.
राहुल गांधी,माजी अध्यक्ष, काँग्रेस
राहुल गांधींच्या मागण्या
- कामगार, लहान व्यापारी, उद्योजकांना कर्जाऐवजी रोख रक्कम द्यावी.
- पतहमी योजना लागू करावी.
- किमान तात्पुरत्या काळासाठी तरी काँग्रेसची 'न्याय' योजना लागू करावी.
- शेतकऱ्यांना १० हजारांचे तत्काळ वितरण करावे.
-----------------
\R