वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर रोजगार घटत चालल्याची टीका होत असतानाच, देशात रोजगाराच्या संधींचा दुष्काळ नसल्याचा दावा केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष गंगवार यांनी केली आहे. शिवाय उत्तर भारतीय तरुणांमध्ये पात्रतेचा अभाव असल्याचे विधान देखील त्यांनी केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. उत्तर भारतीयांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी गंगवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना गंगवार म्हणाले, 'देशात रोजगाराच्या मुबलक संधी आहेत. मात्र पात्र उमेदवारांची कमतरता भासते. उत्तर भारतात भरती प्रक्रिया राबवणारे सातत्याने एकच तक्रार करतात की, येथील उमेदवारांमध्ये आवश्यक पात्रतेचा अभाव आढळतो.' रोजगार घटत चालल्याचा आरोप फेटाळताना ते म्हणाले, 'सन २०१४ पासून माझ्याकडे श्रम आणि रोजगार मंत्रालयच आहे. माझ्या माहितीनुसार, देशात रोजगाराचा दुष्काळ नाही.'
गंगवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. 'मंत्रीजी, पाच वर्षांहून जास्त काळ तुमचे सरकार आहे. नवीन रोजगार निर्माण झाले नाहीत. सरकारने आणलेल्या मंदीमुळे आहेत तेच रोजगार घटू लागले आहेत. सरकार काहीतरी चांगले करेल या आशेने तरुण वाट पाहत आहेत. तुम्ही उत्तर भारतीयांचा अपमान करून तुम्ही स्वत:चा बचाव करू पाहत आहात. मात्र हे चालणार नाही', असे ट्विट प्रियांका यांनी केले आहे.
'वक्तव्याचा विपर्यास'
उत्तर भारतीयांसंदर्भातील विधानावर टीकेची झोड उठल्यानंतर केंद्रीय मंत्री गंगवार यांनी रविवारी याबाबत स्पष्टीकरण केले आहे. 'माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. मी एका विशेष संदर्भात ते वक्तव्य केले होते. मी असे म्हणालो होतो की, उत्तर भारतात भरतीसाठी जाणाऱ्या कंपन्या अशी तक्रार करतात की, काही विशिष्ट नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्याची कमतरता तेथील तरुणांमध्ये जाणवते. तरुणांना नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने कौशल्य मंत्रालय सुरू केले आहे.'