सुनील जाखड यांचा
राजीनामा फेटाळला
चंडीगड : काँग्रेस नेते सुनील जाखड यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने शनिवारी फेटाळला. लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सनी देओल यांच्याकडून पराभव झाल्यानंतर जाखड यांनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आपण आपले काम यापुढेही सुरूच ठेवावे, असे पक्षाच्या पंजाब प्रभारी आशा कुमारी यांनी जाखड यांना कळविले आहे. जाखड यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, असे मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनीही व्यक्त केले होते.
'यूएडी'कडून आभार व्यक्त
नवी दिल्ली : काळ्या यादीतून ३१२ परकी नागरिकांची नावे वगळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल संयुक्त अकाली दलाचे सरचिटणीस भाई सतनामसिंग मनवा यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत. देशविरोधी कारवायांच्या आरोपांखाली शिक्षेचा कालावधी पूर्ण केलेल्यांचीही नावे जाहीर करावीत, अशी मागणीही मनवा यांनी केली आहे. ज्या ३१२ जणांची नावे काळ्या यादीतून काढली आहेत, ते आता अमृतसरमधील हरमिंदर साहिबला भेट देऊ शकतील, अशी आशाही मनवा यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गुरुद्वारा दरबारसाहिब कर्तारपूर येथे भेट देऊ इच्छिणाऱ्या शीख भाविकांकडून दरडोई वीस डॉलर शुल्क घेण्याचा निर्णय रद्द करावा, अशी विनंती मनवा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना केली आहे.
पीडितेची चौकशी
शाहजहाँपूर : भाजप नेते चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित विद्यार्थिनीची शनिवारी विशेष तपास पथकाने चौकशी केली. तिच्याकडून आणि चिन्मयानंद यांच्या शयनकक्षातून काही पुरावेही गोळा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ ४३ व्हिडिओ फिती असलेला एक पेन ड्राइव्ह आपण तपास पथकाकडे दिला आहे, असे पीडितेने सांगितले. चिन्मयानंद यांच्या शयनकक्षातून महत्त्वाचे पुरावे गायब झाले असून, त्या खोलीला नवा लूक देण्यात आला आहे, असेही पीडितेने सांगितले. 'एसआयटी'ने या पीडितेला चिन्मयानंद यांच्या घरी नेऊन तेथे सुमारे पाच तास चौकशी केली.
प्रदेशाध्यक्षपदी जयस्वाल
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने बिहारच्या प्रदेशाध्ययक्षपदी संजय जयस्वाल यांची आणि राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी सतीश पुनिया यांची नियुक्ती केल्याचे शनिवारी जाहीर करण्यात आले. जयस्वाल लोकसभेत खासदार असून, पुनिया आमदार आहेत. जयस्वाल नित्यानंद राय यांची आणि पुनिया मदनलाल सैनी यांची जागा घेतली. राय सध्या केंद्रात मंत्री आहेत. सैनी यांचे नुकतेच निधन झाले.
प्राप्तिकर अधिकाऱ्यावर छापे
नवी दिल्ली : मनी लाँडरिंग केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्राप्तिकर विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या घरी, कार्यालयांत छापे घातले. नीरजसिंह असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते भारतीय महसूल सेवेतील आयुक्त पदावरील अधिकारी आहेत. सिंह यापूर्वी चेन्नई आणि कोलकता येथे नियुक्त होते. त्यांच्याशी संबंधित सहा ठिकाणी छापे घालण्यात आले असून, त्यात कोलकत्यातील दोन, मुंबई आणि पाटणा येथील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे. बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप त्यांच्यावर असून, १५ हजार कोटी रुपयांच्या रोझ व्हॅली चिटफंड घोटाळ्यात ते सामील असल्याचा संशय आहे.