वृत्तसंस्था, लखनऊ
हिंदू समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी पाच जणांना अटक करण्यात आली. त्यातील तिघे गुजरातमधील असून दोघे जण उत्तर प्रदेशमधील आहेत. गुजरातमध्ये पकडलेल्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस महासंचालक हिमांशू शुक्ल यांनी दिली. दरम्यान, प्रत्यक्ष हल्ला केल्याचा संशय असलेले आणखी दोघे बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुजरात एटीएसने अटक केलेल्या तिघांची नावे मौलाना मोहसीन शेख (२४), फैजन (२१) आणि राशीद अहमद पठाण (२३) असल्याचे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी म्हटले आहे. पठाण हा हत्येचा सूत्रधार आहे. तिवारी यांनी प्रेषिताबद्दल काढलेल्या वक्तव्यामुळे संतप्त होऊन ही हत्या केल्याचे संशयितांनी म्हटले आहे. गुजरात एटीएसच्या आम्ही संपर्कात असून अद्याप या प्रकरणात दहशतवाद्यांचे धागेदोरे आढळले नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून मोहम्मद मुफ्ती नईम काझ्मी आणि इमाम मौलाना अनुवरुल हक यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
तिवारी (४५) यांची शुक्रवारी लखनऊमधील खुर्शीदाबाद भागातील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर तिवारी यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी निदर्शने केली.
'दहशत निर्माण करण्यासाठी...'
दहशत निर्माण करण्यासाठी कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आल्याची प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत तसेच यात सहभागी असलेल्यांची गय केली जाणार नाही, असे देखील योगी म्हणाले. दरम्यान, तिवारी यांचे कुटुंबीय आज, रविवारी योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत.