वृत्तसंस्था, भुवनेश्वर
सुमारे ३० किलोमीटर ताशी वेगाने आलेल्या फोनीने २८ किलोमीटरच्या परिसराला पहिल्या फटक्यात तडाखा दिला. लगेचच या वादळाचा वेग ताशी १७५ किलोमीटरवर पोहोचला आणि त्यानंतर ते ताशी २०० किलोमीटर वेगाने घोंघावू लागले. वादळामुळे अनेक झाडे मुळासकट उन्मळून पडली. उन्हाळी शेती, फळबागांची वाताहत झाली. फोणीने भुवनेश्वरलाही तडाखा दिला, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी दिली.
पुरीच्या किनारपट्टीवर थडकल्यावर फोणीने खुर्दा, कटक, भद्रक आणि बालासोर असा प्रवास करत पश्चिम बंगालकडे कूच केले आहे. वादळामुळे भुवनेश्वर व आसपासच्या परिसरातीलही दूरसंचार विभागाच्या लाइन खराब केल्या असून, मोबाइल फोनच्या टॉवरांची हानी झाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. कोलकात्याच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणच्या रस्तेवाहतुकीवरही परिणाम झाला.
प्रचारावर परिणाम
चक्रीवादळाचा परिणाम राजकीय वातावरणावरही झाला असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची आगामी प्रचारसभा रद्द केल्या आहेत. मात्र, 'वादळ पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करील तेव्हा त्याची तीव्रता कमी झाली असेल. वाऱ्याचा वेगही कमी होऊन ते ताशी १०० अथवा ११० वेगाने वाहू लागेल, असा अंदाज आहे,' अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
प. बंगालचा दक्षतेचा इशारा
पश्चिम बंगालमधील किनारपट्टी भागात दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पूर्व व पश्चिम मिदनापूर, पूर्व व दक्षिण २५ परगणा, हावडा, हुगळी, जारग्राम, कोलकाता आणि सुंदरबन या भागांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर आणि कोलकाता येथील विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, कोलकाता-चेन्नई मार्गावरून धावणाऱ्या २२०पेक्षाही अधिक रेल्वेगाड्या शनिवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधानांकडून मदत
ओडिशाला वादळाचा तडाखा बसण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक मदत मंजूर केली आहे. मोदी यांनी शुक्रवारी राजस्थानमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत मदतीची घोषणा केली. नागरिकांवर कोणतीही आपत्ती ओढविली, तरी सरकार लोकांबरोबरच असेल, असे ते म्हणाले. तटरक्षक दल, नौदल आणि लष्कर मदतकार्यात गुंतले असल्याची माहिती त्यांनी दिली.