अ‍ॅपशहर

कागदफेक करणारे काँग्रेसचे ६ खासदार निलंबित

लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने कागदपत्रे भिरकावल्याने काँग्रेसच्या सहा खासदारांना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. गौरव गोगोई, के. सुरेश, अधीरंजन चौधरी, रंजीत रंजन, सुष्मिता देव आणि एम. के. राघवन या पाच खासदारांवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शिस्तभंगामुळे कारवाईचा बडगा उगारला आहे.

Maharashtra Times 24 Jul 2017, 3:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम for unbecoming conduct 6 congress mps suspended from lok sabha for 5 days
कागदफेक करणारे काँग्रेसचे ६ खासदार निलंबित


लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने कागदपत्रे भिरकावल्याने काँग्रेसच्या सहा खासदारांना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. गौरव गोगोई, के. सुरेश, अधीरंजन चौधरी, रंजीत रंजन, सुष्मिता देव आणि एम. के. राघवन या पाच खासदारांवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शिस्तभंगामुळे कारवाईचा बडगा उगारला आहे. हे निलंबन पाच दिवसांसाठी असणार आहे.

जमावाकडून होत असलेल्या हत्या आणि गोरक्षकांच्या मुद्द्यावरून आज लोकसभेत गदारोळ झाला. गोरक्षेच्या नावाखाली निष्पाप लोकांवर जीवघेणे हल्ले केले जात असल्याने देशात भीतीचे वातावरण आहे, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नमूद केले. जमावाकडून हत्येच्या घटना वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा गोरक्षकांना इशारा दिला. मात्र त्यानंतरही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत, असे खर्गे म्हणाले. खर्गे यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करून याप्रश्नी चर्चेची मागणी केली. मात्र, ही मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळली. ही चर्चा शून्यप्रहरात घेतली जाईल, असे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले.

संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनीही सरकारच्या वतीने स्पष्टीकरण दिले. गोरक्षेच्या मुद्द्यावर सरकारने ठाम भूमिका घेतलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असे अनंतकुमार म्हणाले. मात्र, सरकारच्या स्पष्टीकरणाने समाधान न झालेल्या काँग्रेस खासदारांनी गदारोळ सुरू केला. 'वेल'मध्ये उतरून काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागदफेक केली. त्यानंतर अनंतकुमार यांनी या खासदारांवर कारवाईची मागणी केली. त्याचवेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खासदारांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्ही सभागृहात शिस्तभंगाची कोणती पातळी गाठू शकता, हे पूर्ण देश पाहत आहे, असा संताप व्यक्त करत सुमित्रा महाजन यांनी सहा खासदारांवर कारवाईचा बडगा उगारला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज