अ‍ॅपशहर

पशू व्होट देत नाहीत, तरीही त्यांची सेवा करतो

भाजपचा व्होटबँकेवर विश्वास नाही. आम्ही व्होटबँक पाहून विकास कामांना प्राधान्य देत नाही. तर देशाचा विकास करणे हेच भाजपचं मुख्य उद्दिष्टं आहे, असं सांगतानाच जनावरे मतदान करायला जात नाहीत, ते कुणाचेही मतदार नाहीत, तरीसुद्धा आम्ही त्यांचीही सेवा करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होटबँकेच्या राजकारणावर भाष्य केलं.

Maharashtra Times 23 Sep 2017, 1:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । वाराणासी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम for us governance is not about votes or winning polls pm modi
पशू व्होट देत नाहीत, तरीही त्यांची सेवा करतो


भाजपचा व्होटबँकेवर विश्वास नाही. आम्ही व्होटबँक पाहून विकास कामांना प्राधान्य देत नाही. तर देशाचा विकास करणे हेच भाजपचं मुख्य उद्दिष्टं आहे, असं सांगतानाच जनावरे मतदान करायला जात नाहीत, ते कुणाचेही मतदार नाहीत, तरीसुद्धा आम्ही त्यांचीही सेवा करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होटबँकेच्या राजकारणावर भाष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या वाराणासी दौऱ्यावर आले आहेत. आज शाहंशाहपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी विकास कामांची जंत्री सादर करतानाच व्होटबँकेच्या राजकारणावर परखड मत व्यक्त केलं. सभेपूर्वी त्यांनी पशू आरोग्य मेळाव्यालाही भेट दिली. मतांच्या राजकारणासाठी आम्ही सत्ता चालवित नाही. आमच्यासाठी सत्ता म्हणजे निवडणूक जिंकण्याचं साधनही नाही. देशाचा विकास होणं याला आमचं प्राधान्य असतं. इतरांपेक्षा आमची पद्धत जरा वेगळी आहे. आम्ही पक्षापेक्षा देशाला नेहमीच मोठा समजतो. त्यामुळे व्होटबँकेकडे पाहून आम्ही कोणतेही काम करत नाही, असं मोदी म्हणाले.

यावेळी मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. पशूधन आरोग्य मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करतो. शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात दुध विक्रीतून मिळणारा नफा महत्त्वाचा असतो असेही त्यांनी सांगितले. मात्र दुर्दैवाने यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रसंगी मोदींनी स्वच्छतेवरही भाष्य केले. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक असते. बहुसंख्य आजारांचे कारण अस्वच्छता असते. युनिसेफच्या दाव्यानुसार घरात शौचालय असेल तर वर्षभरात आजारपणावर खर्च होणारे ५० हजार रुपये वाचतील. आता ग्रामीण भागात शौचालयांसाठी मोहीम सुरु झाली असून हे चित्र दिलासादायक आहे. स्वच्छता हा स्वभाव झाला असून स्वच्छतेची जबाबदारी सर्वांचीच आहे असेही त्यांनी सांगितले. देशात आजही अनेकांकडे हक्काचे घर नाही. अशा लोकांना २०२२ पर्यंत हक्काचे घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी शेवटी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज