संसदेतून
नवी दिल्ली : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या सुमारे ७८ टक्के छोट्या ठेवीदारांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण पैसे काढण्याची अनुमती देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या बँकेत घोटाळा करणाऱ्या प्रवर्तकांच्या संपत्तीचा लिलाव करून त्या पैशातून ठेवीदारांना दिलासा देता यावा, यासाठी अर्थ मंत्रालय रिझर्व्ह बँक आणि अंमलबजावणी संचालनालयाशी समन्वय साधत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
पीएमसी बँकेत सध्याच्या घडीला ५० हजार रुपये काढण्याची कमाल मर्यादा कायम आहे; परंतु ठेवीदारांना वैद्यकीय उपचार, विवाह, शिक्षण आदी तातडीच्या खर्चांसाठी एक लाखापर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आल्याचे सीतारामन यांनी बिजू जनता दलाचे खासदार पिनाकी मिश्रा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.