वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रस्ते वाहतूक, कोंडी यांसारख्या विविध प्रश्नांवर उपाय सांगणारे, महाराष्ट्रात 'उड्डाणपूल सम्राट' म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजधानीतील प्रदूषणावर सल्ला द्यावा, अशी अपेक्षा खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच बुधवारी व्यक्त केली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर याबाबत सुरू असलेल्या सुनावणीवेळी त्यांनीच गडकरींचे नाव सुचविले.
सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी वाहने हळूहळू इलेक्ट्रिकवर सुरू केल्यास वायू प्रदूषण कमी होऊ शकेल, अशी आग्रही भूमिका गडकरी मांडत असतात. त्यामुळे सुनावणीवेळी बोबडे यांनी त्यांचे नाव सुचविले. दोघेही नागपूरचे सुपुत्र आहेत. 'मंत्री न्यायालयात येऊन याबाबतची मदत करू शकतात का' अशी विचारणा बोबडे यांनी केली. मात्र, मंत्र्यांना बोलावल्यास हा मुद्दा राजकीय होईल, असे मत अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एन. एस. नाडकर्णी यांनी व्यक्त केले. मात्र, त्याला जोडूनच, नेते न्यायालयासमोर उपस्थित राहण्यात तसे चुकीचे नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
गडकरींना कोर्टात येण्यासाठी आदेश देऊ शकत नाही, पण प्रदूषण रोखण्याबाबत असलेल्या नवीन उपाययोजना त्यांनी येथे येऊन सांगाव्यात, असा न्यायालयाचा आग्रह असल्याचे बोबडे म्हणाले. दरम्यान, प्रदूषणाच्या मुद्द्यावरील सुनावणी न्यायालयाने चार आठवड्यांपर्यंत स्थगित केली.