भुवनेश्वर: ओडिशामधील सरकारी शाळांमध्ये वितरित करण्यात आलेल्या पुस्तिकेत 'महात्मा गांधी यांचा मृत्यू अपघाती कारणामुळे झाला', असे नमूद करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी याबाबत जाहीर माफी मागावी व ही अक्षम्य चूक तत्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी केली आहे.
गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त ही दोन पानांची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली होती. 'आमा बापुजी : एक झलक' नावाच्या या पुस्तिकेत गांधीजींचे शिक्षण, कार्य व ओडिशासोबत असलेले नाते याची माहिती देण्यात आली आहे. तसेच 'दिल्लीच्या बिर्ला हाऊसमध्ये ३० जानेवारी १९४८ रोजी अचानक घडलेल्या घटनांमुळे गांधीजींचे अपघाती निधन झाले', असेही यात नमूद करण्यात आले आहे. या पुस्तिकेवरून गदारोळ सुरू झाल्यानंतर पटनाईक सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असले तरी यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.