अ‍ॅपशहर

निर्भया: दोषींना एकाच वेळी फासावर लटकवणार

'निर्भया' बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना एकाच वेळी फासावर लटकावण्याची तयारी तिहार तुरुंग प्रशासनानं सुरू केली आहे. दुसरीकडे, दोषींना नेमकी कधी फाशी देण्यात येईल, याबाबत तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Dec 2019, 12:23 pm
नवी दिल्ली: 'निर्भया' बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना एकाच वेळी फासावर लटकावण्याची तयारी तिहार तुरुंग प्रशासनानं सुरू केली आहे. दुसरीकडे, दोषींना नेमकी कधी फाशी देण्यात येईल, याबाबत तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पतियाळा हाऊस कोर्टानं शुक्रवारी दोषींच्या डेथ वॉरंटवरील सुनावणी तहकूब केली आहे. तसंच एका दोषीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळं फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास लांबणीवर पडू शकते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nirbhaya-Convicts


निर्भया प्रकरणातील चौघा दोषींना फासावर लटकावण्याची तयारी तुरुंग प्रशासनानं सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकाच वेळी चौघांना फाशी देण्यासाठी नव्या तंत्राचं परीक्षण करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी फासावर लटकावले जाते, त्यात काही बदल करण्याचे काम सुरू आहे, असे समजते. चौघांचे वजन एकाच वेळी उचलण्याची क्षमता आहे की नाही हे तपासले जात आहे. चौघांना एकाच वेळी फाशी देणे आवश्यक आहे. अंमलबजावणीवेळी एखाद्याला अस्वस्थ वाटू लागले तर, तो आजारी होऊ शकतो आणि फाशी टळू शकते.

हैदराबाद चकमकीची होणार चौकशी

तिहार तुरुंगाची उत्तर प्रदेशकडे वधिकांची मागणी

जल्लादची मागणी

निर्भया बलात्कार प्रकरणातील चौघा आरोपींच्या फाशीच्या अंमलबजावणीबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता गृहित धरून तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेशकडे दोन जल्लादांची मागणी केली आहे. याला उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक (तुरुंग विभाग) आनंद कुमार यांनी दुजोरा दिला असून, उत्तर प्रदेशनं जल्लाद देण्याची तयारी दाखवल्याचे सांगितले. तिहार तुरुंग प्रशासनाकडे जल्लाद नाहीत. उत्तर प्रदेशकडे दोन जल्लाद असल्याची माहिती असल्यामुळेच तिहारकडून ही मागणी करण्यात आली आहे. अशी मागणी तिहारकडून ९ तारखेला राज्याच्या तुरुंग विभागाकडे करण्यात आली आहे.



सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

निर्भया प्रकरणातील चौघा आरोपींपैकी एका आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवर १७ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याने त्याला २०१७मध्ये देण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. ही विनंती मान्य करत तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज