अ‍ॅपशहर

अण्णांच्या आंदोलनामागे संघ

शेतकऱ्यांचं आंदोलन जनतेच्या हातात जात असल्यानं सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुढे केले असून अण्णांच्या या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2018, 8:16 pm
नवी दिल्ली: शेतकऱ्यांचं आंदोलन जनतेच्या हातात जात असल्यानं सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुढे केले असून अण्णांच्या या आंदोलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस असल्याचा गंभीर आरोप पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hardik patel criticized anna hazare
अण्णांच्या आंदोलनामागे संघ


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पटेलने हा खळबळजनक आरोप केला. चांगल्या कामासाठी समर्थन दिलं जातं. ते सांगून दिलं जात नाही. अण्णांच्या आंदोलनाबाबत कधी त्यांच्याशी बोलणं झालं नाही. त्यामुळे समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या पद्धतीनं ते चांगलंच करत आहेत. त्यांना 'बेस्ट ऑफ लक', अशा शब्दांत हार्दिकने अण्णांच्या आंदोलनावर भूमिका मांडली. 'काल मला जी माहिती मिळाली त्यानुसार अण्णा मला मंचावर येऊ देणार नव्हते. मंचाच्या पाठीमागेच भेटणार होते. पण मुळात आमच्यासारख्या आंदोलकांना अण्णा दिल्लीवाल्यांच्या सांगण्यांवरून दूर का ठेवत आहेत? विरोधी पक्षांच्या आंदोलनातल्या सहभागावर अण्णांचा इतका आक्षेप का? मागच्या आंदोलनात विरोधी पक्ष नव्हते का? मग आताच इतकी टोकाची भूमिका का? तुम्ही जे मुद्दे उचलत आहात, त्याला विरोधी पक्षांचीही साथ असेल तर त्यांची इतकी अॅलर्जी का?, असा प्रश्नांचा भडिमारही त्याने अण्णांवर केला. 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मला भेटायचे असेल तर त्यांनी राजीनामा देऊनच मला भेटायला यावं, असं अण्णा म्हणत असून केजरीवालांसाठी एवढी जाचक अट का ठेवली गेलीय?,' असा सवालही हार्दिकनं विचारला.

तेव्हा अण्णा कुठे होते?

महाराष्ट्रात शेतकरी २०० किलोमीटर चालत विधानभवनावर धडकले, तेव्हा अण्णा कुठे होते? मध्यप्रदेशातील मनसरमध्ये दहा शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं, तेव्हा अण्णा कुठे होते? आम्ही सतत शेतकऱ्यांची आंदोलने छेडली, तेव्हा अण्णा कुठे होते?, असे प्रश्न उपस्थित करतानाच आताच अण्णांना शेतकरी का आठवले?, असा सवालही हार्दिकने केला. सध्या शेतकरीच त्यांची आंदोलने लढत आहेत. त्यामुळे सरकार अस्वस्थ झाले आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रोश दाबण्यासाठीच त्यांनी अण्णाला पुढे केले आहे, असा आरोपही त्याने केला.

'आय हेट अण्णा'

आमची आरक्षणाची मागणी घटनाविरोधी आहे, असं अण्णांना वाटत आहे. पण ते चुकीचं आहे. कारण आरक्षणाचा हक्क आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. त्यामुळे अण्णा मोठे की आंबेडकरांचं संविधान मोठं? आंबेडकर आणि अण्णांची तुलना होत असेल, तर आय हेट अण्णा, अशी टीकाही हार्दिकने अण्णांवर केली.

'त्या' आंदोलनातही भाजप होते

'अण्णांनी काँग्रेस सरकारच्या काळात आंदोलन छेडले होते. त्यावेळी 'मै अण्णा हूँ'च्या टोप्या घालण्यात आल्या होत्या. ते आंदोलनही भाजपच चालवत होतं, असा दावाही त्याने केला. अण्णा म्हणतात पंतप्रधानांना ४३ पत्रे पाठवली, उत्तर नाही दिलं म्हणून आंदोलनाची वेळ आली. मुळात इतका वेळ थांबायचंच कशाला? ५ पत्रांनंतरच का आंदोलनाला बसले नाहीत?,' असा सवालही हार्दिकने अण्णांना विचारला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज