अ‍ॅपशहर

पाकला झटका देण्यासाठी भारताचा ‘माइंड गेम’

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याऐवजी त्यांना चहुबाजूंनी घेरण्याची रणनीती केंद्र सरकार आखत असल्याचे संकेत मिळत असतानाच, पाकच्या जखमेवर मीठ चोळण्याची चलाख चाल भारत खेळणार आहे.

Maharashtra Times 23 Sep 2016, 5:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम home ministry gets baloch leader bugtis papers
पाकला झटका देण्यासाठी भारताचा ‘माइंड गेम’


उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याऐवजी त्यांना चहुबाजूंनी घेरण्याची रणनीती केंद्र सरकार आखत असल्याचे संकेत मिळत असतानाच, पाकला जोर का झटका देण्याची चलाख चाल भारत खेळणार आहे.

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेते ब्रह्मदाग बुगती यांना भारतात राजाश्रय देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने वेगानं हालचाली सुरू केल्याचं सूत्रांकडून कळतं. भारतीय ओळखपत्र आणि व्हिसा मिळवण्यासाठी बुगती यांनी केलेला अर्ज गृह मंत्रालयाकडे पोहोचला आहे. अर्थात, सर्व आवश्यक कागदपत्रांची शहानिशा करूनच त्यांना भारतात राजाश्रय देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सूत्रांनी स्पष्ट केलं.

पाकिस्तान बलुचिस्तानात मोठा घातपात घडवू शकतो, नरसंहार करू शकतो. हात धुवून तो माझ्या मागे लागलाय. आता आम्हाला त्यांच्यापासून वाचवा, भारतात राजकीय आश्रय द्या, अशी साद बलूच रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष बुगती यांनी नवभारत टाइम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घातली होती. बलुचिस्तानवर पाककडून होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख मोदींनी केल्यानंतर, बुगती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे जाहीर आभार मानले होते. त्यावरून पाक खवळला होता. त्यानंतर, बुगती यांनी जिनिव्हामधील भारतीय वाणिज्य दूतावासात राजकीय आश्रयासाठी अर्ज दाखल केला होता. तो तेव्हाच परराष्ट्र खात्याकडे पाठवण्यात आला होता. आता तिथून तो गृह मंत्रालयाकडे पोहोचला आहे.

कुणाला राजकीय आश्रय द्यायचा, याबाबत भारताची कुठलंही ठोस विस्तृत धोरण नाही. संयुक्त राष्ट्रांकडील उपलब्ध माहितीनुसार, सुमारे ६,४८० नागरिकांना भारतात आश्रय हवा आहे. परंतु, सरकारने त्यांचे अर्ज स्वीकारलेले नाहीत. आता मात्र, बुगती यांच्या अर्जावर ज्या पद्धतीने कार्यवाही होतेय, ती पाहता दलाई लामांप्रमाणे त्यांनाही भारतात आश्रय मिळू शकतो. पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी, बलुचिस्तानचा पाठिंबा मिळवण्यासाठी भारताला ही खेळी फायदेशीर ठरू शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज