वृत्तसंस्था, जयपूर
पद्मश्री सन्मान जाहीर झालेले भजन गायक रमजान खान यांनी आपल्या सन्मानाचे श्रेय आपण करीत असलेल्या गोसेवेला दिले आहे. जयपूर येथील बागरु गावामध्ये गेल्या १५ वर्षांपासून ते गोसवा करीत आहेत.
रमजान खान यांचा मुलगा फिरोझ खान याची गेल्या नोव्हेंबरमध्ये बनारस हिंदू विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रमजान खान यांची कृष्णभक्ती आणि गायींप्रति असलेली निष्ठा या बाबी समोर आल्या होत्या. 'मला पद्म सन्मान मिळेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. भजन गायकीबरोबरच गेल्या १५ वर्षांपासून गोशाळेच्या माध्यमातून मी करीत असलेल्या गोसेवेचा हा परिणाम आहे,' असे रमजान म्हणाले.
राष्ट्रपतींच्या हस्ते ज्या पाच व्यक्तींना २०२० चा पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, त्यामध्ये रमजान यांचा समावेश आहे. रमजान हे मशिदीत जाऊन नमाज पठण तर करतातच, शिवाय त्यांनी संस्कृतमध्ये 'शास्त्री' पदवी घेतली आहे. ते भजनाला संगीत देतात तसेच गायनही करतात. गायन हे त्यांचे उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. बागरु गावातील श्री रामदेव गोशाळा चैतन्य धाम येथील मंदिरात दररोज सायंकाळी आरती, भजन आणि भक्तिगीतेही सादर करतात.