म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेनंतर देशातील गरीब आणि कमकुवत घटकांना दिलासा देण्यासाठी काँग्रेसने प्रस्तावित केलेली किमान उत्पन्न हमी 'न्याय' योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.
करोना विषाणूमुळे लाखो लोकांचा जीव संकटात सापडून देशात भय, चिंता आणि अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील सर्वात कमकुवत वर्गाची उपजीविका प्रभावित झाली आहे. या आपत्तीच्या घडीला देशातील प्रत्येक नागरिकाला मदत, सहकार्य आणि सुरक्षेची आवश्यकता आहे. देशवासियांचे आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेच्या या लढ्यात आपल्या सामूहिक स्रोतांचा सदुपयोग करण्याची हीच वेळ आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचे काँग्रेस पक्ष समर्थन करीत असून करोनाला पराभूत करण्यासाठी संपूर्ण देश संघटित आणि एकजूट आहे. करोनाला रोखण्यासाठी सरकारने उचललेल्या प्रत्येक पावलाला काँग्रेस पक्ष साथ देईल, अशी ग्वाही सोनिया गांधी यांनी या पत्रात दिली आहे.
रब्बी हंगामातील पिके कापणीसाठी सज्ज झाली असताना २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांची कर्जवसुली किमान सहा महिन्यांसाठी स्थगित करण्यात यावी, उदारपणाने कृषी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात यावा आणि शेतमालाची हमी भावाने खरेदी सुनिश्चित करण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने १५ हजार कोटींची तरतूद केली असून डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या एन-९५ मास्क तसेच हजमत सूटची तातडीने निर्मिती व खरेदी करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी या पत्रात केली आहे. या वैयक्तिक संरक्षण देणाऱ्या उपकरणांच्या अभावी कुठलाही आरोग्य कर्मचारी करोनाबाधित होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या जीवाचा धोका पत्करून करोनाच्या उपचारांमध्ये गुंतलेले डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना १ मार्च २०२० पासून सहा महिन्यांसाठी विशेष जोखीम भत्ता देण्यात यावा, त्यांना सर्वतोपरी संरक्षण प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. करोनाच्या उपचारासाठी निश्चित करण्यात आलेल्या इस्पितळांचे पत्ते, तेथील खाटांची संख्या, विलगीकरण कक्ष, समर्पित वैद्यकीय चमू, वैद्यकीय पुरवठा आदींविषयी माहितीच्या अभावी अनिश्चितता आहे. ही आवश्यक माहिती एका समर्पित संकेतस्थळाद्वारे जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचविण्यात यावी आणि त्याचबरोबर अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटर्सच्या सोयींसह तात्पुरत्या इस्पितळ सुविधा उभारण्यात याव्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.