अ‍ॅपशहर

उत्तर प्रदेशात प्रचारसभांचा धुरळा

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. सोमवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले, तर मोदींनी या दोघांसह मायावतींवरही जोरदार टीका केली.

Maharashtra Times 21 Feb 2017, 9:00 am
वृत्तसंस्था, बांदा/रायबरेली/जालौन (उ.प्र.)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम in election campain allegations from leaders
उत्तर प्रदेशात प्रचारसभांचा धुरळा


उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. सोमवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले, तर मोदींनी या दोघांसह मायावतींवरही जोरदार टीका केली.

मोदींनी बुंदेलखंडातील जालौनच्या ओराई प्रांतात आयोजित प्रचारसभेत बसपा अध्यक्ष मायावतींचा चांगलाच समाचार घेतला. ‘बसपा आता बहुजन समाज पार्टी राहिली नसून ‘बेहेनजी संपत्ती पार्टी’ झाली आहे. मी ८ नोव्हेंबरला नोटाबंदी जाहीर केल्यानंतर बसपा आणि सप एकमेकांना पाण्यात पाहणारे पक्ष एकत्र आले. काळ्यापैशांविरोधात मोहीम सुरू केल्यानंतर काँग्रेससह सगळे पक्ष एकत्र आले आणि सारखीच भाषा बोलू लागले. मायावतींनी टीका केली की, नोटाबंदी करण्यापूर्वी सरकारने पूर्ण तयारी केली नव्हती. पण त्यांना ‘तयारी’ करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही हे त्यांचे खरे दुःख आहे. स्वतःसाठी पैसा जमावणारे नेते तुमच्यासाठी काम करू शकतील असे तुम्हाल वाटते का, असा सवाल त्यांनी नागरिकांना विचारला.

दुसरीकडे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनीही मोदींवर टीकास्त्र सोडले. अखिलेश यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रायबरेलीमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदींच्या स्मशान आणि कब्रस्तानवरील विधानाचा समाचार घेतला.

मोदींनी सत्यस्थिती सांगावी

मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये आम्ही २४ तास वीज दिली. आता मोदींनी देशाला सत्य सांगितले पाहिजे, असे अखिलेश यांनी सांगितले. मोदी म्हणतात, आम्ही रमजानमध्ये वीज देतो आणि दिवाळीत नाही. पण आता मोदींनी त्यांच्या मतदारसंघातील सत्यस्थिती नागरिकांना सांगावी, असे आव्हानच त्यांनी मोदींना दिले.

हास्य मावळले

सप आणि काँग्रेस एकत्र आल्याने पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले आहे. २०१४मध्ये मोदी म्हणाले होते की, ते वाराणसीचे पुत्र आहेत. वाराणसी माझी आई आहे. मोदीजी नाती जतन करावी लागतात, नुसती सांगून जबाबदारी संपत नाही. तुम्ही उत्तर प्रदेशच्या नागरिकांसोबत निर्माण केलेले नाते निभावणे तुमची जबाबदारी होती. पण तुम्ही तसे केले नाहीत,’ असे राहुल गांधी म्हणाले.

‘बहनजी संपत्ती पक्ष’ आणि ‘निगेटिव्ह दलित मॅन’

पंतप्रधान मोदी यांनी बहुजन समाज पक्षाला ‘बहनजी संपत्ती पक्ष’ असे संबोधल्यानंतर मायावती यांनीही मोदींना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘पंतप्रधान मोदींना बहुजन समाज पक्ष ही आधी चळवळ होती आणि नंतर राजकीय पक्ष बनला आहे, हे कदाचित माहीत नसावे. मी पक्षासाठी, दलित, मुस्लिम आणि वंचितांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी माझे संपूर्ण आयुष्य वेचले आहे. ते मला त्यांची संपत्ती मानतात,’ असे सांगत ‘पंतप्रधान हे नरेंद्र दामोदरदास मोदी नसून मिस्टर निगेटिव्ह दलित मॅन आहेत,’ अशा शब्दांत मायावती यांनी पलटवार केला. राज्यात बहुजन समाज पक्षाची वाढती लोकप्रियता पाहून पंतप्रधान असा शब्दांचा खेळ करीत आहेत. त्यात ते तज्ज्ञ आहेत; परंतु त्यांना जशास तसे उत्तर मिळाल्यास ते सारे काही विसरून जातील, असेही मायावती म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज