अ‍ॅपशहर

SHIV SENA : आम्ही शिवसेना फोडली, नितीशकुमारांवर टीका करत भाजप नेत्याने दिली कबुली

Bihar News : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याने पक्षात मोठी फूट पडली. राज्यात आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गटात विभाजन झाले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडात आमची कुठलीही भूमिका नाही, असा दावा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केला होता. पण आता शिवसेना आम्हीच फोडली, असं मोठं वक्तव्य भाजप नेत्यानं केलं आहे. यावरून पुन्हा भाजप आणि शिवसेना आमने-सामने येण्याची चिन्ह आहेत.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Aug 2022, 11:42 am
पाटणा : जेडीयूचे नेते नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपसोबतची युती तोडल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पण या भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात बसत आहेत. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची सत्ता होती. पण नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडून आता लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हात मिळवला आहे. नितीशकुमार हे आज ८ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण यावरून भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांनी नितीशकुमारांवर बोचरी टीका केली आहे. पण टीका करताना त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केल्याने सुशील मोदी चर्चेत आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray shiv sena
आम्ही शिवसेना फोडली, नितीशकुमारांवर टीका करत भाजप नेत्याने दिली कबुली


नितीशकुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आज दुपारी होण्याची शक्यता आहे. त्यांनी आरजेडीसोबत महाआघाडीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुशील मोदी यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेचं उदाहरण देत नितीशकुमारांवर टीका केली आहे. भाजपसोबत असताना नितीशकुमार यांना मानसन्मान दिला गेला. पण हा सन्मान नितीशकुमार यांना आरजेडीकडून मिळणार नाही, असा टोला सुशील मोदी यांनी लगावला आहे.

फक्त बिहारच नाही तर नितीशकुमारांचा आहे हा मोठा प्लॅन, पाटण्यात लागले पोस्टर

निवडणुकीत जेडीयूच्या तुलनेत भाजपचे अधिक आमदार निवडून आले. तरीही भाजपने शब्द पाळला आणि नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं. आम्ही कधीच नितीशकुमार यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा आम्ही पक्ष फोडला. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपला धोका दिला. आता शिवसेना त्याची फळं भोगावी लागत आहेत. शिवसेना सत्ताबाहेर गेली आहे, अशी टीका सुशील मोदी यांनी केली आहे. निवडणुकीत जनतेने दिलेला कौल नितीशकुमार यांनी धुडकावला आहे. जनतेच्या मताचा अवमान केला आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

Bihar Politics: बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! नितीश कुमारांना सीएम पद; तेजस्वींचं 'पवार स्टाईल' राजकारण

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रादेशिक पक्षांवर टीका करत महाराष्ट्रात शिवसेना संपत असल्याची टीका केली होती. आता सुशील मोदी यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख केला आहे. यामुळे महाराष्ट्रात यावरून पुन्हा राजकारण रंगण्याची चिन्ह आहेत.

महत्वाचे लेख