वृत्तसंस्था, नवी दिल्ली
तुम्ही राहताय मुंबई, ठाण्यात किंवा पुण्यात, तुम्ही मतदारही तिथलेच आहात, पण मतदानाच्या दिवशी काही कारणाने चेन्नई, बेंगळुरू, किंवा दिल्लीत आहात. अशा वेळी तुमचे मतदान हुकणार हे निश्चित. मात्र मतदारांना अशा स्थितीत त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने पावले टाकण्यास सुरुवात केली असून, या कामी आयआयटी मद्रासचे सहकार्य घेण्यात येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मतदानासाठी करणारा हा प्रकल्प सध्या तरी संशोधन-विकासाच्या पातळीवर आहे. ब्लॉक चेनप्रणालीचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे. विशिष्ट आयपी क्रमांक असलेले कम्प्युटर, विशिष्ट इंटरनेट, बायोमेट्रिक यंत्रणा, वेब कॅमेरा अशा सगळ्या सामग्रीनिशी हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वरिष्ठ निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिली. या यंत्रणेतून मतदाराची खात्री पटली की त्याला ई-मतपत्रिका दिली जाईल. त्याद्वारे मतदाराला मतदान करता येईल. मतमोजणीपूर्व टप्प्यावर अशा मतांमध्ये काही फेरफार करण्यात आलेले नाहीत ना, याची खातरजमा करण्यात येईल, अशी माहिती सक्सेना यांनी दिली.
घरच्या घरी मतदान नव्हे!
ही सुविधा प्रत्यक्षात आल्यानंतर मतदारांना ठराविक वेळेत, विशिष्ट ठिकाणी जाऊन मतदान करता येईल. ही सुविधा सर्वत्र आणि सर्वकाळ उपलब्ध नसेल. बाहेरून मतदान याचा अर्थ घरी बसून मतदान असा नव्हे. त्यासाठी ठराविक ठिकाणी जावेच लागेल, असे सक्सेना यांनी स्पष्ट केले.