मान्सूनच्या मागावर
मयुरेश प्रभुणे, मदुराई
मान्सूनचा अर्धा हंगाम संपत आलेला असताना पश्चिम घाट आणि पूर्व किनारपट्टीपासून सामान अंतर राखणारा दक्षिण भारताचा मोठा प्रदेश अद्याप मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आंध्र प्रदेशमधील रायलसीमापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंतच्या भागात उन्हाळा अद्याप संपलेलाच नसल्याचा सध्या अनुभव येत आहे. कावेरी, कृष्णा, तुंगभद्रासारख्या मोठ्या नद्यांचा अपवाद सोडता सर्व नद्या आणि जमिनीवरील जलसाठे कोरडे पडले आहेत.
दक्षिण भारतात पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या दरम्यान असणाऱ्या पर्जन्यछायेच्या प्रदेशाला वर्षभरात नैऋत्य मान्सूनकडून साधारणपणे ३५ टक्के, तर ईशान्य मान्सूनकडून ६५ टक्के पाऊस मिळतो. २०१८ च्या ईशान्य मान्सूनच्या काळात रायलसीमा भागात सरासरीपेक्षा ६२ टक्के कमी, दक्षिण कर्नाटकात ४२ टक्के कमी, तर तामिळनाडूमध्ये २४ टक्के कमी पाऊस झाला. गेले वर्षभर तुरळक पाऊस झालेला हा प्रदेश सध्या राजस्थानच्या कोरड्या हवामानाचा अनुभव घेत आहे. नैऋत्य मान्सूनचा अर्धा हंगाम संपला, तरी या भागात अद्याप पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. प्रोजेक्ट मेघदूतने रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंतच्या प्रवासात नोंद घेतलेल्या विविध प्रकारच्या सुमारे ५० जलसाठ्यांपैकी ९६ टक्के जलसाठे पूर्णपणे कोरडे असल्याचे दिसून आले. कावेरी, कृष्णा आणि तुंगभद्रा नद्या वगळता सर्व हंगामी नद्यांची पात्रे कोरडी असून, लहान- मोठे सर्व तलाव आटले आहेत.
तामिळनाडूच्या मदुराईजवळील अम्बालाताडी गावातील शेतकऱ्यांनी गेली तीन वर्षे धान सोडून कापूस, सोयाबीन आणि मक्याचे पिक घेत असल्याचे सांगितले. गावातील रमेश पंडीयान म्हणाले, 'गेली तीन वर्षे आम्ही भूजलावरच शेती करीत असून, आता गावातील बहुतांश बोअरवेलही बंद पडल्या आहेत. पूर्वी आम्ही वर्षातून तीन पिके घेत असू, आता एक पीक कसेबसे घेता येते. या वर्षीही पाऊस झाला नाही, तर आमची अवस्था अत्यंत बिकट असेल.'
घाटाच्या पूर्व सीमेवर असणाऱ्या राजपलायाममधील गणेश राजू म्हणाले, 'गेली तीन वर्षे आमच्या क्षेत्रातील बहुतेक शेतकऱ्यांनी भाताऐवजी केळीची लागवड केली आहे. पाऊस कमी झाला तरी आमच्या भागातील पारंपरिक तलावांच्या माध्यमातून शेती केली जाते. मात्र, यंदा जमिनीवर कोठेही पाणीसाठा शिल्लक नसून, शेतीसाठी सरसकट भूजलाचाच वापर करण्यात येत आहे.'
गावाने शेती सोडली, पिण्यासाठी 'मिनरल वॉटर'
शिवकाशी जवळील लक्ष्मीपूरम गावातील बहुतांश बोअरवेल बंद होऊन तीन वर्षे झाली असून, संबंध गाव वर्षभर कॅनमधून मिळणारे मिनरल वॉटर विकत घेत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला महिन्याला साधारण साडेचार ते पाच हजार रुपये खर्च येत असल्याचे एस थिरुमली मुत्थु यांनी सांगितले. पाण्याअभावी शेती बंद पडल्यामुळे गावातील बहुतांश कुटुंबातील पुरुष आणि स्त्रिया जवळच असणाऱ्या शिवकाशीच्या फटाक्यांच्या कारखान्यात कामाला जात आहेत. मान्सूनअभावी लक्ष्मीपुरम गाव आता शेतीचेच राहिले नाही.
क्रमश: