वृत्तसंस्था, नवी दिल्ली
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर केला असतानाही व्हिसा नियमांचा भंग करून भारतात राहिलेल्या २५५० विदेशी तबलिगींना केंद्रीय गृह मंत्रालयाने काळ्या यादीत टाकले असून, त्यांना दहा वर्षांसाठी भारतात येण्यास बंदी केली आहे.
लॉकडाउन जाहीर झाला असतानाही हे विदेशी तबलिगी विविध राज्यांतील मशिदी आणि धार्मिक स्थळांमध्ये बेकायदेशीररित्या राहिले होते. त्याविषयी गदारोळ झाल्यानंतर राज्यांनी दिलेल्या माहितीवरून केंद्रीय गृह मंत्रालयाने अशा विदेशी तबलिगींची यादी बनवली असून, त्यांच्यावर भारतबंदीची कारवाई केली आहे.
करोना साथीचा फैलाव रोखण्यासाठी २५ मार्च रोजी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिगींच्या मुख्यालयात २५० विदेशी जमात सदस्यांसह २३०० हून भारतीय तबलिगी धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे आढळून आले होते. त्यांतील अनेकांना नंतर करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.