भारत जगातील शक्तिशाली देश
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ; सैन्य मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी
नवी दिल्ली, वृत्तसंस्था
'भारत जगातील एक शक्तिशाली देश असल्याचे जगातील सर्वच देश मान्य करतात,' असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. शुक्रवारी दिल्लीतील कॅन्टोंमेंट भागात सैन्य मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या लष्करातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार उगवत्या सूर्या सारखी रचना असलेली इमारत ३९ एकर जागेवर उभारण्यात येत आहे. सात मजल्यांच्या या इमारतीचे नाव स्थल सेना भवन, असे आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, 'मी स्थल सेना भवनच्या उभारणीचा पहिला दगड रचला आहे. हा दगड सर्वांत वर कधीच जाणार नाही. पण, हाच या इमारतीचा पहिला दगड असेल. हा दगड आमच्या जवानांनी देशासाठी गाजविलेल्या शौर्याचे आणि दिलेल्या समपर्णाचे प्रतीक असेल.'
सिंह म्हणाले, 'भारत एक शक्तिशाली देश असल्याचे जगातील सर्वच देश मान्य करतात. यापूर्वी कुमकुवत असणारा भारत आज जगात एक शक्तिशाली देश म्हणून उभा राहिला आहे. याचे सर्व श्रेय आमच्या साहसी, बहाद्दूर जवानांना जाते.'
लष्कराची सर्व कार्यालये एकत्र येणार
सध्या सेना दलाचे मुख्यालय ल्युटियन्स दिल्लीतील दक्षिण ब्लॉकमध्ये रायसिना हिल्स येथे आहे. या नव्या इमारतीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाप (सीडीएस) यांचे कार्यालय असेल आणि या नव्या इमारतीत लष्कराची सर्व कार्यालये असतील. सुमारे सातशे कोटी रुपये खर्च करून पुढील चार वर्षांत ही इमारत बांधण्यात येणार आहे. 'गृह-पाच' हे इमारत बांधकामाचे रेटिंग पालन करुन बांधकाम करण्यात येणार आहे. अद्यावत या इमारतीत लष्कराचे एकूण २९०० आणि ३१०० खासगी कर्मचारी काम करतील. कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय, राष्ट्रीय महामार्ग ४४वरून प्रवेश आणि बाहेर जाण्याचा मार्ग असेल. सुमारे चार हजार चारचाकी गाड्यांच्या पार्किंगची सोय या परिसरात केली जाणार आहे.