वृत्तसंस्था, नवी दिल्ली
शांततेसाठी पुढाकार घेतल्याचा देखावा करणाऱ्या पाकिस्तानचे खरे रूप शुक्रवारी पुन्हा उघड झाले. पाकिस्तानात गेलेल्या भारतीय शीख भाविकांना भेटण्यापासून भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना रोखण्यात आले. त्यामुळे या अधिकाऱ्यांना नाईलाजाने इस्लामाबादला परतणे भाग पडले. भारताने या घटनेबद्दल पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदवला आहे.
गुरू नानक जयंती निमित्त भारतातील शीख भाविक २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानातील गुरुद्वारा नानकाना साहिब आणि गुरद्वारा सच्चा सौदा येथे गेले होते. त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना भाविकांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली. या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानात प्रवास करण्याची पूर्वपरवानगी घेऊनही त्यांना अशी वागणूक देण्यात आली. या बद्दल भारताने पाकिस्तान सरकारकडे निषेध नोंदवला आहे.
भारतीय शीख भाविक दोन्ही ठिकाणी जात असताना खलिस्तानवादी घोषणा देणारे फलक लावण्यात आल्याचेही वृत्त आहे. 'भारताविरोधात फुटीरतावाद्यांना मदत करणारा कोणताही छुपा अजेंडा राबविण्यासाठी आमच्या भूमीचा वापर करू न देण्याचे अभिवचन पाकिस्तानने १९७२च्या सिमला कराराद्वारे आणि १९९९च्या लाहोर कराराद्वारे दिले आहे, याची आठवणही भारताने करून दिली, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
भारतीय नागरिकांना भेटण्यापासून भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना रोकण्याची पाकिस्तानची ही सलग तिसरी वेळ आहे. पाकिस्तानची ही कृती व्हिएन्ना करारातील तरतुदींचा भंग करणारी आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे भारतात कल्यारशरीफ दर्ग्याच्या दर्शनासाठी आलेल्या पाकिस्तानी भाविकांना भेटण्याची परवानगी पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्यांना देण्यात आली होती, याकडेही भारताने पाकिस्तानचे लक्ष वेधले आहे.