वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र या गाड्यांतील आसनांचे आरक्षण करताना प्रवाशांना आपल्या गंतव्य ठिकाणाचा पत्ता नमूद करावा लागणार आहे.
ही माहिती आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन भरायची असून ते अनिवार्य असल्याचे रेल्वेचे प्रवक्ता आर. डी. बाजपाई यांनी सांगितले. संबंधित प्रवाशास कालांतराने करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्यास तो कोणाकोणाच्या संपर्कात आला होता याचा मागोवा घेण्यासाठी ही माहिती घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे निर्देश १३ मेपासून लागू करण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास केलेल्या १२ जणांना करोनाची लागण झाल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.