उद्योगपती राजीव बजाज यांची टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
करोना संकटाचा सामना करताना भारताने पौर्वात्य देशांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी दुर्दैवाने केवळ पाश्चात्य देशांचे अनुकरण केले आणि त्यांच्याही पुढे जाऊन कठोर लॉकडाऊन लावला. त्यामुळे करोना फैलावाचा आलेख सपाट होण्याऐवजी अर्थव्यवस्था ध्वस्त होऊन सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) आलेखच जमीनदोस्त झाला, अशी टीका बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी गुरुवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना केली.
घरी बसून करोनासंकट सहन करणारे फार दुःखी नाहीत. पण व्यवसाय आणि सर्वसामान्यांची स्थिती पाहिली, तर त्यांच्यासाठी हा कटु अनुभव ठरला आहे, असे मत बजाज यांनी व्यक्त केले.
अनलॉकच्या दिशेने जाण्यासाठी सहज, ठोस आणि लयबद्ध घडामोडी होताना दिसत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी संघटित दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. ते होताना दिसत नाही. करोनाचा अर्थ मृत्यू ही भीती लोकांच्या मनातून काढणे पहिली समस्या आहे. त्याविषयी स्पष्ट चर्चा झाली पाहिजे. पंतप्रधान मोदी योग्य किंवा चुकीचे जे काही बोलतात, त्याचे लोक अनुकरण करतात. त्यामुळे सारे काही नियंत्रणाखाली आहे. संसर्गाला भिऊ नका. जवळजवळ कोणीच मृत्युमुखी पडत नसून आपल्याला पुढे गेले पाहिजे, असे पंतप्रधानांनी जनतेला सांगितले पाहिजे, असे राजीव बजाज म्हणाले.
'न बोलण्याचा सल्ला'
उत्साह, आत्मविश्वास दिसल्याशिवाय कोणी गुंतवणूक करीत नाही. भारतात अनेक लोक भीतीपोटी किंवा मार्गात अडथळे निर्माण होतील, म्हणून बोलत नाहीत. भारतात सहिष्णुता, संवेदनशीलतेच्या संदर्भात सुधारणांची आवश्यकता आहे. माध्यमांशी बोलणे वेगळे आणि राहुल गांधींशी बोलणे वेगळे आहे. ती जोखीम घेऊ नका, असा मला सल्ला देण्यात आल्याचे बजाज यांनी राहुल गांधींना सांगितले.