म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे निमित्त साधून २ ऑक्टोबरपासून ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जयंतीपर्यंत भाजपच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये दीडशे किलोमीटरच्या पदयात्रांमध्ये सहभागी व्हावे, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिले.
महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती व्यापक स्तरावर साजरी केली जणार असून, महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरच्या गांधीजयंतीपासून ३१ ऑक्टोबरच्या सरदार पटेल जयंतीपर्यंत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दीडशे किमी अंतराची पदयात्रा काढण्यात येईल आणि त्यात भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी किमान एक दिवस सहभागी होतील. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात १५ ते २० गट स्थापन करून रोज पंधरा किमी पदयात्रा, प्रत्येक बूथवर संपर्क साधून पाच झाडे लावणे, महात्मा गांधी आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची माहिती देणे हे उपक्रम राबविले जातील, असे पंतप्रधान मोदी यांनी निर्देश आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली.