२० डॉलर शुल्काच्या मुद्द्यावरून रखडला करार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कर्तारपूर येथील दरबार साहिब गुरुद्वारा येथे भारतीय भाविकांना प्रवेशासाठी २० डॉलर शुल्क आकारण्याबाबत पाकिस्तानने आपली अडेलतट्टू भूमिका कायम ठेवल्याने या दोन्ही देशांमध्ये शनिवारी या संदर्भातील करार होऊ शकला नाही. त्यामुळे या गुरुद्वारातील दर्शनासाठी रविवारी सुरू होणे अपेक्षित असलेली ऑनलाइन नोंदणी सुरू होऊ शकली नाही. 'भारत व पाकिस्तान यांच्यात काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने रविवारी ऑनलाइन नोंदणी सुरू होऊ शकली नाही,' अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, यासंदर्भात २३ ऑक्टोबर रोजी करारावर स्वाक्षरी करण्यास भारत तयार आहे, मात्र पाकिस्तानने २० डॉलरच्या शुल्काचा फेरविचार करावा, अशी विनंती परराष्ट्र खात्याने केली आहे.
शीखधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या पाकिस्तानातील कर्तारपूर येथे भारतीय भाविकांना व्हिसाशिवाय दर्शन घेता यावे, यासाठी विशेष कॉरिडॉर बांधण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र कर्तारपूर येथे प्रवेशासाठी प्रत्येकी २० डॉलरचे शुल्क आकारण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावरून गाडे अढले आहे. चर्चेच्या तीन फेऱ्यांनंतरही पाकिस्तानने हे शुल्क आकारण्याची भूमिका कायम ठेवल्याने भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या शुल्कावर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही टीका केली होती.
पाकिस्तानकडून श्रद्धेचा बाजार : हरसिम्रत
चंडिगढ : कर्तारपूर येथील दरबार साहिब गुरुद्वारा येथे दर्शनासाठी येणाऱ्या भारतीय भाविकांकडून प्रत्येकी २० डॉलर सेवाशुल्क आकारण्याचा पाकिस्तानचा निर्णय म्हणजे श्रद्धेचा बाजार मांडणे आहे, या शब्दांत केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी टीकास्त्र सोडले आहे. 'कर्तारपूर साहिबच्या दर्शनासाठी प्रत्येकी २० डॉलर शुल्क आकारणे म्हणजे अत्याचार आहे. गरीब भाविक हे पैसे कुठून देणार? पाकिस्तानने श्रद्धेचा बाजार मांडला आहे. या शुल्कामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि परकीय चलन मिळेल, हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा लाजिरवाणा आहे,' अशी टीका हरसिम्रत कौर यांनी ट्विटरवर केली आहे.