वृत्तसंस्था, श्रीनगर
कलम ३७० हटवल्यानंतर लागू करण्यात आलेले निर्बंध शनिवारी काश्मीरच्या बहुतांश भागांतून हटवण्यात आले. त्याच वेळी सुरक्षा दलांचा बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम ५ ऑगस्ट रोजी रद्द केल्यानंतर या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. ते हळूहळू हटवले जात आहेत. शनिवारी काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भागांतील निर्बंध हटवण्यात आले. त्यामुळे रस्त्यांवर लोकांची वर्दळ दिसून आली. अनेक भागांतील बॅरिकेड्स हटवण्यात आले असून शहरात आणि खोऱ्यात मात्र काही रस्त्यांवर काटेरी तारांचे अडथळे कायम ठेवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निर्बंध हटवण्यात आल्याने शनिवारी रस्त्यांवर मोठ्या संख्येने वाहने दिसत होती. कार्यालयांमध्ये देखील कर्मचाऱ्यांची उपस्थिती चांगली होती. दुकाने आणि बाजारपेठा मात्र सलग २०व्या दिवशी बंद होत्या. सार्वजनिक वाहनांची वाहतूक देखील बंद होती. बाटामालू आणि लाल चौकात काही फेरीवाल्यांनी दुकाने थाटल्याचे दिसत होते.
प्रेस काउन्सिलकडून निर्बंधांचे समर्थन
केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारने या राज्यातील प्रसारमाध्यमांवर लागू केलेल्या निर्बंधांचे प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) समर्थन केले असून आपली भूमिका स्पष्ट करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. तसेच, काश्मीर टाइम्सच्या कार्यकारी संपादिका अनुराधा भसीन यांनी मोबाइल, इंटरनेट, टेलिफोनवरील निर्बंध हटविण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेत हस्तक्षेप करण्याची मागणी देखील पीसीआयने केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रसारमाध्यमांवरील निर्बंध योग्य असल्याचे पीसीआयने आपल्या अर्जात म्हटले आहे.