वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सनदी अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष अखेर मंगळवारी संध्याकाळी मिटला. हा प्रश्न मिटवण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठका घ्या, असे पत्र नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना लिहिल्यानंतर अधिकारी आणि 'आप'च्या मंत्र्यांचे बैठकींचे सत्र सुरू झाले. त्यानंतर केजरीवाल यांनी ११ जूनपासूनचे धरणे आंदोलन मागे घेत नायब राज्यपालांचे कार्यालय सोडले.
नायब राज्यपाल यांचे कार्यालय सोडल्यानंतर केजरीवाल आपल्या निवासस्थानी परतले. तेथे 'आप' कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. 'सनदी अधिकाऱ्यांच्या संपाला नायब राज्यपालांनी फूस दिली असेल तर ते दुर्दैवी आहे. ९९ टक्के सनदी अधिकाऱ्यांची वर्तणूक चांगली आहे. वीज आणि पाणीपुरवठ्याबाबत आपल्या सरकारने खूपच चांगले काम केले आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय हे करणे आम्हाला शक्य झाले नसते. पण, 'आप' सरकारला सहकार्य न करण्यासाठी आमच्यावर दबाव येत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी आम्हाला खासगीत सांगितले. म्हणून हा प्रश्न जनतेपुढे आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले', असे केजरीवाल कार्यकर्त्यांपुढे बोलताना म्हणाले. 'आमचा छोटा का होईना, पण विजय झाला असून, दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठीचा लढा चालूच राहणार आहे', असे ते पुढे म्हणाले.
दरम्यान, 'केजरीवाल यांचे नऊ दिवसांचे नाटक संपले असून, त्यांनी यातून काय साध्य केले तेच लोकांना कळेनासे झाले आहे', अशी प्रतिक्रिया भाजपच्या वतीने प्रवक्ते मनोज तिवारी यांनी व्यक्त केली. केजरीवाल यांचा फोलपणा उघड झाला असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसने मात्र आप आणि भाजप या दोघांनाही लक्ष्य केले. 'या दोन्ही पक्षांनी दिल्लीत नाटकी राजकारणाचा खेळ चालवला आहे', असे प्रतिक्रिया काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी दिली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सनदी अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष अखेर मंगळवारी संध्याकाळी मिटला. हा प्रश्न मिटवण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठका घ्या, असे पत्र नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना लिहिल्यानंतर अधिकारी आणि 'आप'च्या मंत्र्यांचे बैठकींचे सत्र सुरू झाले. त्यानंतर केजरीवाल यांनी ११ जूनपासूनचे धरणे आंदोलन मागे घेत नायब राज्यपालांचे कार्यालय सोडले.
नायब राज्यपाल यांचे कार्यालय सोडल्यानंतर केजरीवाल आपल्या निवासस्थानी परतले. तेथे 'आप' कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. 'सनदी अधिकाऱ्यांच्या संपाला नायब राज्यपालांनी फूस दिली असेल तर ते दुर्दैवी आहे. ९९ टक्के सनदी अधिकाऱ्यांची वर्तणूक चांगली आहे. वीज आणि पाणीपुरवठ्याबाबत आपल्या सरकारने खूपच चांगले काम केले आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय हे करणे आम्हाला शक्य झाले नसते. पण, 'आप' सरकारला सहकार्य न करण्यासाठी आमच्यावर दबाव येत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी आम्हाला खासगीत सांगितले. म्हणून हा प्रश्न जनतेपुढे आणण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले', असे केजरीवाल कार्यकर्त्यांपुढे बोलताना म्हणाले. 'आमचा छोटा का होईना, पण विजय झाला असून, दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठीचा लढा चालूच राहणार आहे', असे ते पुढे म्हणाले.
दरम्यान, 'केजरीवाल यांचे नऊ दिवसांचे नाटक संपले असून, त्यांनी यातून काय साध्य केले तेच लोकांना कळेनासे झाले आहे', अशी प्रतिक्रिया भाजपच्या वतीने प्रवक्ते मनोज तिवारी यांनी व्यक्त केली. केजरीवाल यांचा फोलपणा उघड झाला असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसने मात्र आप आणि भाजप या दोघांनाही लक्ष्य केले. 'या दोन्ही पक्षांनी दिल्लीत नाटकी राजकारणाचा खेळ चालवला आहे', असे प्रतिक्रिया काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी दिली.