अ‍ॅपशहर

केरळ: सर्वसामान्यांपेक्षा डॉक्टरांचा मृत्यू लवकर

सर्वसामान्य माणसापेक्षा केरळातील डॉक्टरांचा लवकर मृत्यू होतो, असं एका पाहणीतून आढळून आलं आहे. लोकांना उदंड आयुष्य जगण्याचा आरोग्यमंत्र देणाऱ्या डॉक्टरांनाच दीर्घायुष्य लाभत नसल्याचं वाचून कादाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते खरं आहे.

Maharashtra Times 20 Nov 2017, 3:03 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kerala doctors die earlier than general public study
केरळ: सर्वसामान्यांपेक्षा डॉक्टरांचा मृत्यू लवकर


सर्वसामान्य माणसापेक्षा केरळातील डॉक्टरांचा लवकर मृत्यू होतो, असं एका पाहणीतून आढळून आलं आहे. लोकांना उदंड आयुष्य जगण्याचा आरोग्यमंत्र देणाऱ्या डॉक्टरांनाच दीर्घायुष्य लाभत नसल्याचं वाचून कादाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते खरं आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने केलेल्या एका अभ्यासातून ही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. केरळातील सर्वसाधारण मल्याळी व्यक्तीला साधारणपणे ७४.९ वर्षापर्यंतच आयुष्य लाभतं. त्या तुलनेत केरळातील डॉक्टर ६१.७५ वर्षातच जगाचा निरोप घेत असल्याचं या अभ्यासातून आढळून आलं आहे.

दहा वर्षाच्या अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यासाठी १० हजार डॉक्टरांचा अभ्यास करण्यात आला. २००७ ते २०१७ या कालावधीत केरळात २८२ डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यात ८७ टक्के पुरुष तर १३ टक्के महिला डॉक्टरांचा समावेश होता. त्यातील २७ टक्के डॉक्टरांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने, २५ टक्के डॉक्टरांचा मृत्यू कर्करोगाने, दोन टक्के डॉक्टरांचा संसर्गाने तर एक टक्का डॉक्टरांचा मृत्यू इतर कारणांनी झाल्याचं पाहणीत आढळून आलं. देशातील डॉक्टर सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत दहा वर्ष आधीच जगाचा निरोप घेतात, तर केरळमधील डॉक्टरांना १३ वर्ष आधीच मृत्यू येत असल्याचंही या अभ्यासात अधोरेखित करण्यात आलं आहे.

आयुष्य कसं जगलं पाहिजे?, जीवनशैली कशी असावी?, दीर्घायुषी होण्यासाठी कोणते आहार घेतले पाहिजे? हे डॉक्टरांना इतरांच्या तुलनेत जास्त माहीत असतं, असं असतानाही डॉक्टरांचच आयुष्य घटत असल्याचं पाहून धक्का बसल्याचं आयएमएच्या संशोधकांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे अत्यंत कमी वयात मृत्यू होणाऱ्या या डॉक्टरांमध्ये केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी डॉक्टरांचाही समावेश असल्यानं आयएमएनं चिंता व्यक्त केली आहे.

...म्हणून होतो लवकर मृत्यू

डॉक्टरांचा लवकर मृत्यू होण्यामागची अनेक कारणंही आयएमएनं विषद केली आहेत. अति काम, कामाचा तणाव, रोज एकाच प्रकारच्या रुग्णांना तपासणं आदी कारणांमुळे डॉक्टरांना हृदयविकार, मधूमेह आणि लकवा सारख्या घातक आजारांची शिकार व्हावं लागत असल्याचं आएमएचे अध्यक्ष डॉ. व्ही.जी. प्रदीप कुमार यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज