वृत्तसंस्था, पाटणा
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीतून (एनपीआर) अतिरिक्त उपकलमे काढून टाकण्याची मागणी केंद्र सरकारकडे केल्याची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी दिली. राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतरांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावरील चर्चेस उत्तर देताना नीतीशकुमार म्हणाले की, 'एनपीआर'च्या अंमलबजावणीबाबत कसलाही संभ्रम नाही. कोणत्याही नागरिकास जन्मस्थळ वगैरे माहिती विचारली जाणार नाही. दरम्यान, २०१०च्या नमुन्यानुसारच एनपीआर करण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर झाला. तसेच राज्यात एनआरसीची गरज नसल्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष असूनही नितीशकुमारांनी 'एनपीआर'ला विरोध केला होता. त्यांनी याबाबत केंद्राला लिहिलेले पत्र सभागृहात वाचून दाखविले. 'राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) देशभर लागू केली जाणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले असूनही विरोधक त्याविरोधात रान उठवत आहेत,' असे त्यांनी सांगितले.