वृत्तसंस्था, श्रीनगर
सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी अयोध्या प्रकरणाचा निकाल जाहीर केला. या पार्श्वभूमीवर श्रीनगर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे श्रीनगर शहरात रविवारी ईदच्या दिवशीही जनजीवन विस्कळीतच होते. प्रसिद्ध हजरतबल मशिदीकडे जाणारे रस्ते सुरक्षादलांनी बंद केले होते, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. ईदनिमित्त जुलूस काढण्यास बंदी घातली होती. श्रीनगर परिसरात ईदनिमित्त कोणतेही मोठे कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी होती. याशिवाय, सार्वजनिक वाहतूक बंद होती, बाजारपेठाही दुपारपर्यंतच सुरू होत्या. श्रीनगर शहरातील जनजीवन विस्कळीतच होते.
दरम्यान, जम्मू विभागात प्रशासनाने जुलूस न काढण्याच्या अटींवर ईद साजरी करण्यासाठी निर्बधात सूट दिली होती. त्यामुळे लोकांनी मोठ्या संख्येने मशिदींमध्ये जाऊन ईद साजरी केली. सीमेवरील पूँचसारखे काही संवेदनशील जिल्हे वगळता जम्मू विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवरील अडथळे, काटेरी तारा, कुंपणे हटविण्यात आली होती. संचारबंदीजन्य निर्बंध हटविण्यात आली होती. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली जमावबंदी मागे घेण्यात आली होती. शनिवारीच निर्बंध मागे घेण्यात आल्याने लोक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले होते.
पंतप्रधानांच्या शुभेच्छा!
नवी दिल्ली : 'मिलाद उन नबी'निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी टि्वटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. 'सर्वांना मिलाद उन नबीनिमित्त शुभेच्छा. पैगंबर महंमद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या जन्मदिनानिमित्त नागरिकांमध्ये करुणा आणि सद्भाव या भावना वृद्धिंगत होत जाव्यात. सर्वत्र शांता नांदावी,' असेही मोदी यांनी ट्विटद्वारे संदेश दिला आहे.
...
जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद
जम्मू : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन जिल्ह्यात रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महामार्गावर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. रस्त्यावर कोसळलेला दगड-मातीचा ढिगारा हटविण्यासाठी यंत्रसामग्री आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. युद्धपातळीवर काम सुरू आहे, तरीही रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्यास सुमारे १३ तासांचा कालावधी लागणार असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. प्रवासी वाहने, बस, ट्रक, अशी सुमारे १३०० वाहने महामार्गावर अडकून पडली आहेत.